पिकांनी टाकली मान; शेतकरी हतबल !

By Admin | Updated: August 19, 2015 21:29 IST2015-08-19T21:29:48+5:302015-08-19T21:29:48+5:30

खंडाळा तालुका : पावसाची ओढ संपेना, जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर दशरथ ननावरे - खंडाळा

Got it; Harmful farmers! | पिकांनी टाकली मान; शेतकरी हतबल !

पिकांनी टाकली मान; शेतकरी हतबल !

हजारो रुपयांचं मातीआड झालेलं बियाणं, डोक्यावर पांढरफटकं आभाळं, कुठं-कुठं उगवलेली पिकंही कोमजली जाऊ लागलीत. पावसानं दिलेली ओढ. त्यामुळे संपूर्ण खरीप हंगामच धोक्यात आला असून, आता पुढचे दिवस कसे जाणार? हीच चिंता लागून राहिलेला शेतकरी राजा पुरता हवालदिल झाला आहे. रात्रन्दिवस कुटुंब, जनावरं कशी जगवावीत हाच घोर जिवाला लागल्याने खंडाळा तालुक्यातील शेतकरी कोलमडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एरव्ही जून महिन्यात मान्सूनचा पाऊस दाखल होतो. त्यामुळे जूनअखेरपर्यंत बहुतांशी पिकांची पेरणी पूर्ण होते. यावर्षीही शेतकऱ्यांनी आपल्या पेरण्या पूर्ण केल्या आहेत. त्यासाठी हजारो रुपयांचे बियाणे मातीआड केले; परंतु वरुणराजाने पुरती पाठ फिरवल्याने अद्यापही पावसाचा मागमूस नाही. तालुक्यातील अनेक ठिकाणची पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांचा वर्षभराचे आर्थिक नियोजन खरीप हंगामावर अवलंबून असते. मात्र पावसाअभावी हे सर्वच नियोजन कोलमडून पडले आहे. तालुक्याचा बागायती भागात बाजरी पीक कसेबसे तग धरून आहे. मात्र, इतर पिके जगण्याची शाश्वती कमी आहे. पश्चिम भागातील भातपिकाचे क्षेत्र लागवड झालेल्यापैकी ६० टक्के क्षेत्र कोमेजून गेले आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार आहे. तालुक्यात खरीप हंगामासाठी १८,३८४ हेक्टर क्षेत्र उपलब्ध असते. यावर्षी १४,६१९ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आले आहे. भात, बाजरी, मका, घेवडा, वाटाणा, तूर, उडीद, मूग, भुईमूग, सोयाबीन इतर गळित व कडधान्ये या पिकांचा समावेश असतो. या संपूर्ण क्षेत्रासाठी लाखो रुपयांचे बियाणे शेतकऱ्यांनी खरेदी केले होते. मशागतीसाठीही लाखांवर खर्च केला आहे. खंडाळा तालुक्यातील खरीप हंगामासाठी पिकावर उपलब्ध क्षेत्र व त्यापैकी लागवड झालेले क्षेत्र खालीलप्रमाणे : पिके उपलब्ध क्षेत्र लागवड क्षेत्र पिके उपलब्ध क्षेत्र लागवड क्षेत्र (हेक्टर) (हेक्टर) (हेक्टर) (हेक्टर) भात ११७६ ५५४ घेवडा ४८३ ४२६ बाजरी १२६०३ १००४४ वाटाणा २८७ १४१ मका ५७९ ४५६ तूर २२ २२ तृणधान्ये १२९ ११ उडीद १८१ १५४ भुईमूग १२२५ १०७१ मूग ३३० २८८ सोयाबीन १०६९ ११४० इतर कडधान्ये २०१ २४० इतर गळीत ९९ ७२ खंडाळा तालुक्यातील एकूण क्षेत्रापैकी ८० टक्के क्षेत्रात पेरणी पूर्ण झाली आहे. भात पिकांची अवस्था नुकसानकारक असून, जवळपास ६० टक्के भात लागवड वाया जाण्याच्या स्थितीत आहे. बागायती भागात बाजरी पिके अजूनतरी व्यवस्थित असली तरी इतर पिकांची स्थिती गंभीर आहे. पाऊस पडला नाही तर मोठे नुकसान संभवते. - शिवाजी मांगले, कृषी अधिकारी, खंडाळा पावसाअभावी आमची पिके धोक्यात आहेत. यावर्षी उत्पन्न मिळेल असे वाटत नाही. जनावरांच्या चाऱ्याचीही समस्या मोठी आहे. माणसं कशीबी जगवू; पण जनावरांच्या पोटाचं काय? असा घोर लागला आहे. शासनाने चाऱ्याचा प्रश्नावर मार्ग काढावा. - लक्ष्मणराव धायगुडे, शेतकरी

Web Title: Got it; Harmful farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.