खंबाटकी घाटातून जाताय? ...सावधान!

By Admin | Updated: December 2, 2014 23:35 IST2014-12-02T21:56:11+5:302014-12-02T23:35:28+5:30

प्रशासनाचे दुर्लक्ष : तुटलेल्या संरक्षक कठड्यामुळे प्रवास झालाय जीवघेणा

Going through the Khambatki Ghat? ... be careful! | खंबाटकी घाटातून जाताय? ...सावधान!

खंबाटकी घाटातून जाताय? ...सावधान!

खंडाळा : खंबाटकी घाटातील अरुंद वळण रस्ते, तुटलेले संरक्षक कठडे, खचलेल्या साईडपट्ट्या यामुळे घाटरस्त्याचा प्रवास जीवघेणा ठरत आहे. महामार्ग रस्ते विकास प्राधिकरणाकडे अनेकदा सूचना करूनही यामध्ये काहीच बदल झालेला नाही. त्यामुळे खंबाटकी घाटातील प्रवास आल्हादायक वाटत असला तरी तो तितकाच घातकही आहे. त्यामुळे प्रवाशांनो जरा जपूनच...
खंबाटकी घाट व बोगदा परिसर अनेक प्राणघातक अपघाती घटनांमुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. गेल्या दोन वर्षांत शेकडो प्रवाशांचा नाहक बळी गेला आहे. अपघातानंतर अनेकदा रस्त्याच्या सुधारणांबाबत प्रशासनाकडे सूचना केल्या जातात. मात्र तात्पुरती होकारार्थी मान डोलावणारे अधिकारी पुन्हा लक्षही देत नाहीत. हे नेहमीचाच अनुभव खंडाळकरांसाठी आहे. पूण्याहून साताराकडे जाताना लागणाऱ्या घाटातील रस्त्याची दुरवस्था आहे. या स्त्यावरील ठिकठिकाणचे संरक्षक कठडे तुटून पडले आहेत. याठिकाणी वाळूची पोती भरून ठेवली असली तरी अपघातात गाडी कोसळून घाटात जाण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या साईडपट्ट्या खचलेल्या आहेत. त्यामुळे एकाच वेळी दोन वाहनांना प्रवास करता येत नाहीत. घाटातील ही स्थिती प्रवासासाठी घातक ठरत आहे. मात्र हायवे प्रशासन मात्र अद्यापही गांधारीच्याच भुमिकेत आहे.
साताराहून पुण्याकडे जाताना बोगदा ओलांडल्यानंतरही रस्त्याची वळणे घातक ठरत आहेत. अशास्त्रीय वळणांमुळे कित्येक अपघात घडले आहेत. सहा महिन्यांपूर्वी खासगी बसच्या अपघातामुळे वळणांचा धोका प्रकर्षाने जाणवला होता. यानंतर ही वळणे काढून सरळ रस्ता बनविण्याचे प्रशासनाने ठरवले होते. या वळणांवर केवळ पांढरे पट्टे ओढून सूचना फलक लावले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Going through the Khambatki Ghat? ... be careful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.