जिलेटिन स्फोटाचा तपास सीबीआयकडे द्या
By Admin | Updated: January 19, 2015 00:26 IST2015-01-18T22:27:12+5:302015-01-19T00:26:24+5:30
जयकुमार गोरे : शेखरवर कारवाई झालीच पाहिजे; संबंधित पवनचक्की कंपन्यांवर गुन्हा का नाही ?

जिलेटिन स्फोटाचा तपास सीबीआयकडे द्या
सातारा : बोथे जिलेटिन स्फोट प्रकरणाचा तपास नि:पक्षपातीपणे होत नसून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआय अथवा सीआयडीकडे देण्याची मागणी बोथे ग्रामस्थांच्या वतीने आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, प्रजासत्ताकदिनी आम्ही पालकमंत्री विजय शिवतारे यांना निवेदन देणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही ग्रामस्थ भेटणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.आ. गोरे म्हणाले, ‘बोथे येथील स्फोट अवैध जिलेटिन साठ्यामुळे झाला आहे. हा साठा करण्याचा अधिकार, परवाना बोथे विंड मिल अथवा त्याच्या सहयोगी कंपन्याकडे नव्हता. पोलीस अधीक्षकांनाही तसे म्हटल्याचे माझ्या वाचनात आले. हा साठा ज्या कंपन्यांनी केला त्यांनी बोथे येथील लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या प्रकरणात पहिल्याच दिवशी दाखल झालेली फिर्याद लक्षात घेता पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलेले नाही. तरीही पोलीस तपासात बदल होईल, असा आशावाद होता. मात्र, ज्या ‘कमल एंटरप्रायजेस’ कंपनीवर गुन्हा दाखल केला ती कंपनी येथे काम करत होती का, याची खातरजमाही पोलिसांनी केली नाही.
आ. गोरे म्हणाले, ‘कमल एंटरप्रायजेस’ येथे काम करत नाही. तत्कालीन भागीदार अंकुश गोरे यांनी ‘बोथे विंड फार्मा’ आणि ‘स्कायझेन’चे अरविंद बन्सल यांना मी आता येथे काम करत नसल्याचे सांगून आपण येथून पुढे या डोंगरावर बेकायदेशीर काम करू नये, असे पत्राद्वारे कळविले होते. त्याचबरोबर अंकुश गोरे यांनी वकिलामार्फत दुसरे भागीदार शेखर यांना येथे बेकायदेशीर काम करू नये, अशा आशयाची नोटीस दोनवेळा बजावली. यानंतर अंकुश गोरे यांनी ‘कमल एंटरप्रायजेस’मधील भागीदारी संपुष्टात आणली असल्याचे सांगत ठाणे येथील न्यायालयात दावा दाखल केला. या संपूर्ण प्रकाराची माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना होती. तरीही त्यांनी अंकुश गोरे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. मात्र, हे करत असताना येथे सद्य:स्थितीत काम करणाऱ्या ‘आदित्य’ आणि ‘आर्यन’ या कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्याची तसदी मात्र घेतली नाही.’ प्रायजेस’ने तर ५५ पवनचक्क्या ‘आदित्य’ आणि ‘आर्यन’ने बसविल्या. मात्र, या दोन कंपन्यांचे नाव कोठे येणार नाही, याची काळजी पोलिसांनी घेतली असल्याचा आरोप करून आ. गोरे म्हणाले, ‘या संपूर्ण प्रकरणात आर्थिक तडजोड असल्याची शक्यता आहे. ‘आर्यन’ कंपनीला कोणी नेमले याचा तपास पोलिसांनी केला का? आणि येथे सुरक्षाव्यवस्था पुरविण्याचे काम कोणाकडे होते, याचा शोध जर पोलिसांनी घेतला तर जिलेटिनचा साठा कोणाचा होता, याचे उत्तर पोलिसांना मिळेल. मात्र, पोलीस तपास करत नाहीत. याप्रकरणात ज्यांचा संबंध नाही, अशा अंकुश गोरे यांना अटक केली. जे सत्य आहे, ते समोर आलेच पाहिजे. यातून कोणी सुटता कामा नये.’ (प्रतिनिधी)
वारुगड येथील अवैध साठ्याचे काय झाले?
बोथे डोंगरावर ज्यावेळी घटना घडली त्याचवेळी संबंधित कंपनीचा वारुगड येथील कार्यालयात आणखी अवैध जिलेटिन साठा होता आणि तो येथून तत्काळ हलविला असल्याचा आरोप आ. जयकुमार गोरे यांनी केला. गोरे म्हणाले, ‘याची कल्पना मी पोलिसांना दिल्यानंतरही ते येथून वारुगडला जायला तयार झाले नाहीत. त्यांना कारण विचारले तर गाडी नसल्याचे उत्तर त्यांच्याकडून आले. मात्र, तशी परिस्थिती नव्हती. येथे अनेक गाड्या होत्या. तरीही पोलिसांनी त्या ठिकाणी जाण्यास विलंब केला,’ असेही गोरे म्हणाले.
मुदगल म्हणतात, लेखी हवे...
माण तालुक्यातील बोथे येथील जंगला नामक डोंगरावर घटना घडल्यानंतर पालकमंत्री विजय शिवतारे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी येथे भेटी दिल्या. या भेटीदरम्यान मीही उपस्थित होतो. आमदार या नात्याने मी पालकमंत्री विजय शिवतारे यांच्याकडे बोथे येथील डोंगरावर सुरू असलेल्या कामकाज, अवैध जिलेटिन साठा याच्या अनुषंगाने तक्रार केली. याचवेळी येथे उपस्थित असणारे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल ‘मला लेखी तक्रार द्या,’ असे सांगतात. मी तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे. आमदारांकडेच जर ते लेखी द्या म्हणत असतील तर अवघड आहे, अशी खंतही आमदार गोरे यांनी व्यक्त केली.
सरकार आमचे;
पण मी अपक्ष होतो
बोथे डोंगरावरील अवैध उत्खनन, बेकायदा जिलेटिन साठा अनेक दिवसांपासूनचा विषय आहे. त्यावेळी आपणच आमदार होता. त्यावेळी हे काम अवैध वाटले नाही का, असे गोरे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘बोथे विंड मिल आणि त्याच्या सहयोगी कंपन्या येथे मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन करत असल्याबाबतची तक्रार तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडे केली होती. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केले असल्याचा आरोप आ. गोरे यांनी केला. मात्र, याचवेळी पत्रकारांनी तुमचेच सरकार असताना त्याची दखल का घेतली नाही, असा प्रतिप्रश्न केला असता ‘सरकार आमचे होते, हे मान्य आहे; पण मी अपक्ष होतो,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
आदित्य, आर्यन कंपन्या कोणाच्या?
आ. जयकुमार गोरे यांनी बोथे प्रकरणातील संशयित शेखर गोरे याच्या नावाचा उल्लेख मात्र टाळला. पत्रकारांनी याविषयी त्यांना अधिक छेडले असता आदित्य आणि आर्यन कंपन्या कोणाची आहे, याची अधिकृत कागदपत्रे माझ्याकडे आली नसल्यामुळे मी अधिक बोलू शकत नाही. मात्र, याप्रकरणात गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये शेखर गोरेचे नाव असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देताच मी त्याचेही नाव घेतले असून, आपल्याला ते ऐकू आले नसावे. मी त्याचे नावे घेतले आहे आणि त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लोणंदमधून कोण येते ?
आ. जयकुमार गोरे यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतले. लोणंद येथून साताऱ्यात भेटायला कोण आले, याची माहिती जर घेतली तर बऱ्याच माहितीचा उलगडा होईल, असा दावाही आ. गोरे यांनी यावेळी केला.
आरोपी लपून बसले
आहेत: पद्माकर घनवट
बोथे प्रकरणात आमदार जयकुमार गोरे यांनी केलेले आरोप खोटे आहेत. त्यांनी दिशाभूल करणारी वक्तव्ये करू नयेत. स्थानिक गुन्हे शाखेचे काम योग्य पद्धतीने सुरू आहे. या प्रकरणाचा तपास प्राथमिक अवस्थेत आहे. पोलीस अजूनही निष्कर्षापर्यंत आलेले नाहीत. संशयितांवर कारवाई होणारच आहे. जिलेटिनचा साठा कोणाचा होता हे तपासात पुढे येणारच आहे. तपासादरम्यान, सशयितांची नावे उघड झाल्यामुळे संशयित लपून बसले आहेत. त्यांच्याविषयी जर कोणाला माहिती असेल तर त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी केले.