चार आण्याचं दूध.. बारा आण्याचा चारा
By Admin | Updated: November 7, 2014 23:38 IST2014-11-07T21:32:20+5:302014-11-07T23:38:56+5:30
दूध उत्पादकांची कोंडी : पशुखाद्याचे दर कमी करण्याची मागणी

चार आण्याचं दूध.. बारा आण्याचा चारा
कमलाकर खराडे - पिंपोडे बुद्रुक --दूध दरामध्ये एक महिन्याच्या अवधित तब्बल चार रुपये प्रतिलिटर घट झाल्याने आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची कोंडी होत असून, आता पशुखाद्याचे दरही कमी करण्याची मागणी शेतकरी दूध उत्पादकांकडून केली जाऊ लागली आहे.
दूग्ध व्यवसाय नुकताच बाळसे धरू लागला असताना अचानक एवढी मोठी कपात झाल्यामुळे शेतकरी अक्षरश: हतबल झाला आहे. दूध व्यवसायातील बड्या प्रस्थांकडून आणि पशुखाद्य कंपन्यांकडून शेतकरी अर्थव्यवस्था कमजोर करण्याचा कुडील डाव खेळला जात आहे. दिवसेंदिवस सर्वच पातळीवर महागाई वाढत असताना अचानक एकाच महिन्यात दूध पावडर निर्यात बंद कशी झाली. अचानक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पावडरच्या दरामध्ये घट कशी झाली आणि एकाच महिन्यात अतिरिक्तदूध संकलन कसे झाले, हे न उलगडणारे कोडे असून, यामध्ये मोठे षङ्यंत्र असल्याचा संभव आहे.
दुधाच्या दरामध्ये घट झाली, पशुखाद्याचे दर मात्र नेहमीप्रमाणे दर पंधरा दिवसांनी, एक महिन्यांनी किमान पंचवीस ते पन्नास रुपये पोत्यामागे वाढतच आहेत, ते कमी करण्याची गरज निर्माण झालेली आहे.
मुळातच पशुखाद्य उत्पादन करणाऱ्या कंपन्या या दूध व्यावसायिक संस्थांशी संलग्न आहेत. अनेक दूध संस्थांची स्वत:ची पशुखाद्य उत्पादने आहेत. आणि ती उत्पादने घेण्यासाठी शेतकऱ्यांवर अनेकदा सक्तीही केली जाते.
फायदा-तोट्याचे असेही एक गणित. योगायोगाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोलचे दर कमी झाल्यामुळे आपल्याकडे पेट्रोल प्रतिलिटर दोन रुपये कमी झाले आहे. एक शेतकरी सरासरी महिन्याला १५ लिटर पेट्रोल वापरतो. त्याचा महिन्याचा खर्च साधारणपणे १००० रुपये होतो. वर्षाचा १२,००० रुपये यातून शेतकऱ्याचा फायदा झाला. साधारण ३०० रुपये; पण तोच शेतकरी रोज २५ लिटर दूध डेअरीमध्ये घालतो. म्हणजे, महिन्याला ७५० लिटर. वर्षाला होतात ९००० लिटर. जर प्रतिलिटर चार रुपये दर कमी झाला तर वार्षिक तोटा झाला. ३६,००० रुपये आता शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी आणि उद्योगपतींनी प्रामाणिकपणे सांगावे की, ही शेतकऱ्याची आर्थिक कोंडी अथवा लूट आहे की नाही ?
जर आपण २५ लिटर दूध उत्पन्नाचा विचार केला तर आजच्या बाजार भावाने दुधाचे होतात ५०० रुपये. त्यासाठी खर्च होतो पशुखाद्य २०० रुपये, चारा १५० रुपये, मजुरी व इतर खर्च १५० रुपये, एकूण होतात ५०० रुपये, मग शेतकऱ्यांनी फक्त शेणासाठी राबायचे का? असा प्रश्न उपस्थित होतो.
दूध दर्जेदार पाहिजे; पशुखाद्याचा दर्जा कोण तपासणार ?
शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या कोणत्याही घटकाचा बाजारभाव ठरविण्याचा अधिकार शेतकऱ्याला नाही. अगदी दूध उत्पादनाबाबतही तोच नियम लागू होतो. दूध संकलन केंद्रामध्ये घेऊन गेल्यावर त्या दुधाचा नमुना तपासून त्यातील पाण्याचे प्रमाण, प्रोटीन, सिग्धांश आदी तपासण्या करून त्याचा दर ठरविला जातो. तो प्रत्येक शेतकऱ्यासाठी वेगळा असतो आणि मिळेल तो दर घ्यावा लागतो. त्याबाबत तक्रार चालत नाही. याच्या पूर्ण उलटे गणित पशुखाद्याचे आहे. मुळातच एक शेतकरी जे पशुखाद्य आपल्या गार्इंसाठी वापरतो. त्याचे अनुकरण दुसरा करत असतो. मात्र, त्याच्या गुणवत्तेबाबत कधीही शेतकरी जागरुक नसतो.
शेतकरी संघटना नेहमीच शेतकऱ्यांबरोबर आहे. दूध व्यवसायातून शेतकऱ्यांची होणारी आर्थिक कोंडी फोडण्यासाठी राज्य शासनाबरोबर बोलणी करणार आहे आणि ऊस परिषदेच्या धर्तीवर दूध परिषदेचे आयोजनही करण्याचा संघटनेचा मानस आहे.
- सदाभाऊ खोत, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना
दूध दरामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. त्यामुळे जमा-खर्चाचे प्रमाण बिघडले आहे. आता पशुखाद्याचे दर कमी होणे गरजेचे आहेच; मात्र दूध दरामध्ये वाढ झाली तरच व्यवसाय टिकेल; अन्यथा शेतकरी उद्ध्वस्त होईल.
- बाळासाहेब गार्डी - दूध उत्पादक शेतकरी, पिंपोडे बुद्रुक