चाळीस वर्षांनंतर मंदिरं उघड्यावर!
By Admin | Updated: May 31, 2016 00:33 IST2016-05-30T23:07:05+5:302016-05-31T00:33:15+5:30
कोयनेच्या इतिहासातील भीषण चित्र : शिवसागर जलाशयात जिथं फिरायच्या बोटी, तिथं आता पायी चालतायत माणसं -- आॅन दि स्पॉट --रिपोर्ट

चाळीस वर्षांनंतर मंदिरं उघड्यावर!
सागर चव्हाण -- पेट्री -कोयना धरणाच्या निर्मितीपासून यंदा प्रथमच शिवसागर जलाशयात कमालीची घट झाली आहे. ज्या जलाशयातून लोक लाँचने ये-जा करत होते, तिथं आता जलाशयाच्या भेगाळलेल्या जमिनीवरून लोक चालत जातानाचे दृश्य पाहायला मिळत आहे. एवढे नव्हे १९९४ आणि २०१४ मध्येही पाणी कमी झाल्यामुळे जलाशयातील मंदिर उघडी पडली होती, मा यंदा पाणी एवढे कमी झाले आहे की, गेल्या चाळीस वर्षांपासूनची ग्रामदैवतांची मंदिरं पूर्णपणे उघडी पडली आहेत.
सातारा जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ तसेच मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणाऱ्या तापोळ्यासह आजूबाजूच्या परिसरात कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाचे पाणी पसरले आहे. गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी तसेच उन्हाची तीव्रता अधिक असल्याने व अवकाळी पावसाने पूर्णपणे ओढ दिल्याने तुलनेत पाणीपातळीत कमालीची घट झाली आहे. यंदा केवळ ६७ टक्के एवढाच पाणीसाठा नदीपात्रात होता. परिणामी येथील बहुतांशी सर्वच ठिकाणी पाण्याखाली असणारी जमीन उघड्यावर पडलेली आहे. त्यामुळे दूर दूरपर्यंत फक्त मृगजळासारखा भास होत आहे.
सातारा शहराच्या पश्चिमेस ३५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बामणोलीपर्यंत (कसबे) एसटी बसेसद्वारे वाहतूक करून कांदाटी, कोयना, सोळशी खोऱ्यातील १०५ गावांचा संपर्क जिल्हा परिषदेच्या सर्व्हिस लाँचेस व खाजगी लाँचेसद्वारेच होतो. गेल्या काही आठवड्यापासून पाण्याअभावी लाँचेस बंद असून खासगी वाहनांतून काही जण प्रवास करत आहेत. तर काही गावांना पायपीट करूनच संपर्क ठेवावा लागत आहे.
बहुतांशी येथील काही गावांचा संपर्क लाँचेसद्वारे होत असून पावसाळ्यात कोयनेच्या पाणीपातळीत वाढ झाल्यावर लाँच बंद ठेवावी लागत असल्यामुळे काही गावे संपर्कहीन होतात. मात्र,
यंदा पाणीच नसल्यामुळे लाँच
बंद ठेवण्याची वेळ व्यावसायिकांवर
आली आहे.
त्यामुळे नागरिकांना कित्येक मैल बाजारहाट डोक्यावर घेऊन तापोळ्यातून पायपीट करावी लागत आहे. साताराहून बामणोली मार्गे तेटली, गोगवेपर्यंत जाण्यासाठी बसेसची सोय आहे.
याठिकाणी पर्जन्यमान अधिक असल्याने मोठ्या स्वरूपात पाऊस पडून संपूर्ण जलाशय पाण्याने काठोकाठ व्यापलेला असतो. सध्या या जलाशयाच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर घट होत असल्याने पावसाळ्यात पाण्याखाली असणाऱ्या जमिनी उघड्यावर आलेल्या आहेत. यामुळे सर्व लाँचेस काठाला लागलेल्या दिसून येत आहेत. पर्यटनासाठी बहुतांशी सर्व महाबळेश्वर येथे आलेले पर्यटक पाण्याअभावी नौकाविहाराचा आनंद घेता येत नसल्याने या भागाकडे पाठ फिरवू लागले आहेत.
बामणोलीचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर
जावळी तालुक्यातील बामणोली हे पर्यटनस्थळ सातारा शहराच्या पश्चिमेस ३५ किलोमीटर अंतरावर आहे. येथे प्राचीन भैरवनाथ मंदिर पडलेल्या स्थितीत आहे. मंदिराचा फक्त चौथरा पाहायला मिळतो. तसेच विविध प्रकारची शिल्पे, मूर्ती, पिंड, याचे दर्शन होते. पाणी कमी झाल्यामुळे हे मंदिरही पूर्णपणे उघडे पडले आहे. यापूर्वी १९९७, २०१४ मध्ये अशी स्थिती झाली होती.
पिंपरीचा शंभू महादेव
बामणोलीपासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर वाघळी शेंबडी येथील कांदाटी-कोयना नदीच्या संगमावर पिंपरी, ता. महाबळेश्वर येथे प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिरही पडलेले आहे. धरणनिर्मिती झाल्यानंतर गाव दुसरीकडं वसलं अन् मंदिर जागेवरच राहिलं. ते पाण्याखाली गेल्यानं पडलं आहे. आता पाण्याची पातळी खालवल्यामुळे नदीपात्रातील मंदिराच्या खुणा स्पष्ट दिसू लागल्या आहेत. याठिकाणी असलेल्या महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी लोकांची गर्दी होते.
बोटी लागल्या किनारी
शिवसागर जलाशयाचा पाणीसाठा प्रचंड प्रमाणात घटल्यामुळे प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटी आता किनारी लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. वाहतुकीसाठी काही गावांना एकमेव साधन असणाऱ्या लाँचेस बंद पडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना कित्येक मैल दूर पायपीट करावी लागत आहे.
२०१३-१४ च्या तुलनेत यंदा जलाशयाच्या पाण्याची पातळी अधिक खालावलेली आहे. गेल्या वर्षी पाऊस सुरू होईपर्यंत लाँचेस चालू होत्या. मात्र सध्या पर्यटनाचे नंदनवन असणाऱ्या तसेच नौकाविहाराचा आनंद देणाऱ्या या परिसरात कमी पाणीपातळी असल्याने पर्यटकांना नौकाविहाराचा आनंद घेता येत नाही.
- बाबूराव भोसले,
गोगवे, सोळशी खोरे
शिवसागर जलाशयाचा फुगवटा असणाऱ्या कांदाटी, कोयना, सोळशी खोऱ्यात पात्रातील बहुतांशी पाणी कमी झाले असून ठिकठिकाणी डोह तयार झाले आहेत. अशा डोहाच्या ठिकाणी पर्यटक नौकाविहार करतात. परंतु बऱ्याच ठिकाणी गाळ वर आला असून दलदलीचे प्रमाण वाढलेले आहे. यामुळे लाँच बंद ठेवाव्या लागल्या आहेत. परिणामी भेगाळलेल्या पात्रातून दीड तास पायी बामणोलीतून तापोळ्याकडे चालत जाण्याशिवाय पर्याय नाही.