चाळीस वर्षांनंतर फुटला कूपनलिकांना पाझर!

By Admin | Updated: August 19, 2015 22:14 IST2015-08-19T22:14:31+5:302015-08-19T22:14:31+5:30

‘जलयुक्त शिवार’चे फलित : कोरेगावच्या तालुक्याच्या दुष्काळी भागात जलक्रांती

Forty years after the fungus buds! | चाळीस वर्षांनंतर फुटला कूपनलिकांना पाझर!

चाळीस वर्षांनंतर फुटला कूपनलिकांना पाझर!

वाठार स्टेशन : दुष्काळाशी कायम संघर्ष करणारया कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील पिंपोडे बुदु्रक गावानजीक वसना नदीवरील पुरातन ब्रिटिशकालीन पाझर तलावाचे खोलीकरण व पुनर्भरण करण्यासाठी शासनाच्या जलयुक्त शिवारमधून दुरस्ती केल्यानंतर आता या तलावात मुबलक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे चाळीस वर्षांनंतर गावातील कूपनलिकांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. १९७२ पासून उत्तर कोरेगाव तालुक्याला दुष्काळ व निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागत आहे. पिंपोडे बुद्रुक गावाच्या पश्चिमेस वसना नदीवर ब्रिटिशकालीन तलाव अस्तित्वात आहे. गेल्या ४० वर्षांपासून हे धरण गाळाने भरल्याने धरणात पाणीसाठा राहत नाही, तसेच दरवाजे तुटल्याने येणारे पाणी वाहून जात होते. मात्र शासनाने नुकतेच जलयुक्त शिवार योजनेतून या तलावातील गाळ काढल्यामुळे पाणीपातळी वाढली आहे. या कामासाठी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, तहसीलदार अर्चना तांबे, राष्ट्रीय जनकल्याण समितीचे विजयराव पंडित, सरपंच मच्छिंद्र केंजळे, जनार्दन निकम, भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पिसाळ, पंचायत समिती सदस्य अशोक लेंभे, विकास खुस्पे, बाळासाहेब कदम या ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.
सुमारे चारशे मीटर लांब व ५० फूट रुंद तसेच १० ते १२ फूट खोलिकरण असे सुमारे चार महिने या तलावाचे काम सुरु होते. जून महिन्यात मान्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने हा तलाव ओसंडून वाहू लागला. परिणामी तलावाच्या काठावरील विहिरी, कूपनलिकांची पाणीपातळी वाढली आहे. बंद असलेल्या कूपनलिका पाणीसाठ्यामुळे पुन्हा सुरु झाल्या. गावातल्या हातपंपांनाही पाझर फुटला. सध्या या तलावाचे काही प्रमाणात काम अपूर्ण राहिले असून हे काम पूर्ण करण्यासाठी आता या तलावातील पाणीसाठा कमी होण्याची वाट पहावी लागणार आहे. या तलावाचे राहिलेले काम पूर्ण झाल्यास पाणीसाठ्यात अजून वाढ होणार आहे.कायम दुष्काळी भाग अशी छाप असलेल्या या गावात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जलक्रांतीच झाली असुन दुष्काळी भागाला नवसंजवनीच मिळाली आहे. (वार्ताहर)


मुलं घेतायत डुंबण्याचा आनंद
चाळीस वर्षांनंतर पहिल्यांदाच पाणीसाठा झाल्याने आज हा पाझर तलाव सर्वांचेच आकर्षण बनला आहे. एवढेच नाही तर या पाझर तलावात मनसोक्त डुंबण्याचा आनंद लुटण्यासाठी अनेक गावांतून मुले दररोज येऊ लागली आहेत.



सोळशी ते पळशी या वसना नदीच्या उगमस्थानाच्या पट्ट्यात जागोजागी पाणी अडविण्याचे काम झाल्यास या भागाची परिस्थिती निश्चित बदलू शकते. या योजनेत जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेऊन ही चळवळ यशस्वी करावी.
- सतीश धुमाळ, जिल्हा परिषद सदस्य

Web Title: Forty years after the fungus buds!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.