एक किलोत म्हणे पाच भाज्या !
By Admin | Updated: September 11, 2014 23:18 IST2014-09-11T22:13:10+5:302014-09-11T23:18:42+5:30
पितृपंधरवडा : वाढत्या दरावर सामान्यांनी काढला तोडगा

एक किलोत म्हणे पाच भाज्या !
सातारा : पितृपंधरवड्याचे सोपस्कर करण्यासाठी आवश्यक असलेली भाजी चांगलीच महागली आहे. या महागाईवर मार्ग काढण्यासाठी सामान्यांनी आता नामी शक्कल काढली आहे. या विधीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व भाज्या एकत्र करून त्या एक किलो घेणे आता स्वस्त पडत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक एक किलो मिक्स भाजी घेवून हा विधी पार पाडत असल्याचे चित्र अनेक घरांमध्ये दिसत आहे.
अवकाळी पाऊस आणि भाज्यांवर पडलेला आजार यामुळे यंदा भाज्यांची आवकही मंदावली असल्याचे चित्र दिसते. पितृपंधरवड्यात गवारी, भोपळा, भेंडी, ढेसा, बटाटा, मेथी या भाज्यांना विशेष मागणी असते. या भाज्यांची मागणी वाढल्याने याचे दर सामान्यांच्या अवाक्या बाहेर गेले आहेत. मंडईत सरासरी वीस रूपये पावशेर या दराने भाजी मिळत आहे. सगळ्या भाज्या पावशेर घ्यायच्या म्हटलं तर ते १२० ते १५० रूपयांपर्यंत जाते. यापेक्षा मिक्स भाजी घेतली तर ८० रूपयात काम होते, असे सामान्यांचे मत आहे.
पितृपंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर भाजी मंडईत भाज्या कडाडल्या असून, भेंडी, कारले व हिरव्या मिरचीचे दर प्रतिकिलो ८० रुपये एवढे भडकले आहेत. पालेभाज्यांचे दरही भडकले असून, भेंडी, कारले व वाटाणा प्रतिकिलो ८० रुपये, गवारी, भेंडी व दोडका ६० रुपये, पावटा, सिमला मिरची, वांगी ४० रुपये, टोमॅटो व बटाटो ३० रुपये, कोबी,काकडी व कांदा २० रुपये, मेथी पेंडी वीस रुपये व कोथिंबीर पेंडी १५ ते २० रुपये असा दर कडाडला आहे. (प्रतिनिधी)
पितृपंधरवड्यामुळे बाजार समितीत भाज्यांची मोठ्या प्रमाणावर आवक वाढली आहे. मात्र, वाढत्या भाजीच्या किंमतीचे दर लक्षात घेवून पितृपंधरवड्याची केवळ औपचारिकता पूर्ण करण्याकडे अनेकांचा कल असल्याचे दिसते.
पितृपंधरवड्यासाठी सपक भाजी करण्यात येते. बऱ्याच घरांमध्ये यातील अनेक भाज्या अनिच्छेने खालल्या जातात. त्यामुळे नागरिकांनी एकत्र भाज्या घेवून जावून विधी करण्याचे नियोजन केले आहे.