पहिल्याच अवकाळी पावसाने रस्त्याची पोलखोल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:06 IST2021-01-08T06:06:48+5:302021-01-08T06:06:48+5:30
मायणी : सोमवारी मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसाने मायणी-दहीवडी राज्य मार्गावर पडलेले खड्डे पंधरा दिवसांत पूर्वीच भरले होते. या भरलेल्या ...

पहिल्याच अवकाळी पावसाने रस्त्याची पोलखोल!
मायणी : सोमवारी मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसाने मायणी-दहीवडी राज्य मार्गावर पडलेले खड्डे पंधरा दिवसांत पूर्वीच भरले होते. या भरलेल्या खड्ड्यांचे एकाच अवकाळी पावसाने पोलखोल केली. निकृष्ट पद्धतीने भरलेल्या खड्ड्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थ, वाहनचालकांकडून होत आहे.
मिरज-भिगवण राज्य मार्गावरील मायणी-दहीवडी मार्गातील खटाव तालुक्यातील धोंडेवाडी, सूर्याचीवाडी, बनपुरी, कातरखटाव, बोंबळी, तडवळे या खटाव तालुक्यातील सुमारे २५ किलोमीटर अंतरावरील खड्डे संबंधित विभागाकडून पंधरा दिवसांपूर्वी करण्यात आले होते. मोठे खड्डे भरून लहान खड्डे तसेच सोडण्यात आले होते. याबाबत ‘लोकमत’मधून आवाज उठवल्यानंतरही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे पूर्ण कानाडोळा केला होता.
अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने संबंधित ठेकेदाराने हे खड्डे स्वतःच्या मर्जीप्रमाणे भरले व काम उरकले. सोमवारी मध्यरात्री तालुक्यातील बहुतांशी ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे पंधरा दिवसांपूर्वी भरलेले खड्डे पुन्हा जैसे थे अवस्थेत दिसू लागले आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची व ठेकेदारांची चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थ व वाहनचालकांकडून होत आहे.
चौकट..
मार्गावर दोन टक्केच खड्डे भरले....
मिरज-भिगवण राज्य मार्ग केंद्राकडे गेल्या दोन वर्षांपूर्वी वर्ग केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व राज्य शासनाचा यावर निधी टाकला जात नाही. त्यामुळे या मार्गावरील फक्त दोन टक्के खड्डे भरण्यात आले होते, अशी माहिती अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे.
चौकट..
विटा ते माहुली रस्ता कारपेट, तर कातरखटाव-तडवळे का नाही?
सांगली जिल्ह्यातील विटा ते माहुली या मार्गावर गतवर्षी कारपेट टाकून दुरुस्ती करण्यात आली होती. गतवर्षी झालेल्या पावसामुळे हा मार्गही खड्डेमय झाला होता. मात्र येथील नेतेमंडळी व अधिकाऱ्यांनी निधी आणून डांबरीकरण व कारपेटचे दोन स्तर टाकून चांगल्या दर्जाचे काम पूर्ण केले आहे. त्यांना कोठून निधी उपलब्ध होतो, असा प्रश्न सातारकर उपस्थित करत आहेत.
06मायणी
कातरखटाव-तडवळे (ता. खटाव) मार्गावर १५ दिवसांत पुन्हा खड्डे तयार झाले आहे. (छाया : संदीप कुंभार)