दोन दशकांत प्रथमच आंब्याचे दर स्थिर
By Admin | Updated: June 17, 2016 00:47 IST2016-06-16T22:05:56+5:302016-06-17T00:47:36+5:30
साताऱ्यातील स्थिती : एप्रिल, मे, जूनमध्ये घसरण नाही; पुढील महिन्यात आंब्याला निरोप
दोन दशकांत प्रथमच आंब्याचे दर स्थिर
सातारा : झाडांना मोहर बहरला असला तरी पोषक वातावरण नसल्याने मोठ्या प्रमाणात मोहर झडला असल्याने यंदा बाजारात मागणी पेक्षा कमी उत्पादन झाले. त्याचा परिणाम मागील वर्षाच्या कालखंडात प्रथमच अंब्यांचा दर संपूर्ण हंगाम टिकून राहिला असून, पुढील महिन्यात पहिल्या आठवड्यातच आंबा बाजारातून निरोप घेईल, असे मत व्यापारी वर्गातून होऊ लागले आहे. कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू, आंध्रप्रदेशमधून येणारा हापूस, पायरी, केशर आणि तोतापुरी आंब्यांचे यंदा २५ ते ३० टक्केच उत्पादन झाले असल्याने आवक मंदावली आहे. त्यामुळे उपलब्ध आंब्याचे दर संपूर्ण हंगाम स्थिरावला आहे. हंगाम सुरू झाल्यापासून हापूस ६०० रुपये ४ डझनची पेटी दर स्थिरावून आहे. तर पायरी, केशर, नीलम, तोतापुरी यांची डझनाचे बॉक्स साधारणत: १५० ते ३०० रुपये विक्रमी जात आहे. यांचेही दर कमी न झाल्याने यंदा गरिबांपासून कोसो दूर आंबा राहिला आहे. सातारा तालुक्यातील विविध ठिकाणांहून आलेला आंबाही यंदा चांगलाच भाव खाऊन गेला. साडे तीनशे रूपये डझनपासून सुरू झालेला हा दर आता शंभर रूपयांवर येवून थांबला आहे. तालुक्यातील विविध ठिकाणांहून पाटी आणि कॅरेटमध्ये आंबे घेवून ते पोवईनाका, राजवाडा, बॉम्बे रेस्टॉरन्ट, बसस्थानक या शहरातील मोक्याच्या ठिकाणी विकणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस चांगलीच वाढली होती. मुक्कामी गाडीने साताऱ्यात यायचे आणि आंबे विकुन झाले की दहा अकरापर्यंत पुन्हा गावी जाण्याचे या शेतकऱ्यांची दिनचर्या झाली होती. अनेक शेतकऱ्यांनी यंदा आंब्याच्या माध्यमातून लाखोंचे उत्पन्न घेतले आहे. यंदा कमी पाऊस, अवकाळी पावसाची कमतरता आणि मोहर लागले, त्यावेळी पोषक वातावरण नसल्याने आंब्याच्या उत्पादनात घट झाली असल्याचे शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी) पेट्यांची जागा बॉक्सने घेतली कोकणमधून येणारा हापूस आंबा हा शक्यतो लाकडी पेटीतून ६ डझन भरून येतो; परंतु यंदा दर वाढल्याने पेटी खरेदीकडे फारसे ग्राहक येत नसल्याचे पाहून कोकणातील शेतकऱ्यांनी यावर उपाययोजना म्हणून १ डझनाचे बॉक्स पॅकिंग करून विक्रीसाठी बाजारात उपलब्ध केले. याला ग्राहकांकडूनही मागणी आहे. मागील वर्षी १५ आॅगस्टपर्यंत आंब्याचा हंगाम सुरू होता; परंतु यंदा आंबा उत्पादनात कमालीची घट झाली असून, मागणीपेक्षा कमी आंबा असल्याने दरही स्थिरावले आहेत. परिणामी यंदा हा हंगाम जुलैच्या पहिल्याच आठवड्यात संपुष्टात येईल, अशी परिस्थिती बाजारपेठेत दिसत आहे. -इरफान बागवान, घाऊक व्यापारी