बंद गाड्यांमुळं पाचगणीत एकेरी मार्ग!
By Admin | Updated: November 23, 2015 00:27 IST2015-11-22T21:29:43+5:302015-11-23T00:27:02+5:30
गॅरेजचालकाची कमाल : पर्यटकांची होतेय फसगत; अरुंद रस्त्यामुळे वाहतुकींचा तासन्तास खोळंबा

बंद गाड्यांमुळं पाचगणीत एकेरी मार्ग!
पाचगणी : टेबल लॅण्डमुळे जगाच्या नकाशावर पोहोचलेल्या पाचगणीत दरवर्षी देश-विदेशातून लाखो पर्यटक येत असतात. जगभरात पाचगणीचे नाव चांगल्या अर्थाने जाण्याऐवजी वाईट कारणानेच पोहोचत आहे. या ठिकाणी असलेल्या एका गॅरेजमध्ये दुरुस्तींसाठी आलेल्या कार एकामागे एक अनेक वर्षांपासून लावलेल्या आहेत. त्यामुळे रस्ता एकेरी बनला असल्याचे तासन्तास वाहतुकीची कोंडी होत आहे.
पाचगणी शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न होत असताना शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील बंद स्थितीतील उभ्या असलेल्या वाहनांचा अडथळा होत आहे. हा अडथळा पोलीस यंत्रणा केव्हा दूर करणार व वाहतुकीला केव्हा शिस्त लागणार, अशी चर्चा पाचगणी शहरात रंगली आहे.
याबाबत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने याबाबत पाचगणी पोलिसांना या गाड्या काढण्याबाबत निवेदन दिले आहे.
अद्यापही कसलीच कार्यवाही न झाल्याने स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आंदोलनाच्या तयारीत असल्याचे या पक्षाचे तालुकाध्यक्ष अविनाश भोसले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
शहरातील अंतर्गत रस्त्यांवर अशा प्रकारची नादुरुस्त वाहने, बंद स्थितीतील गाड्या मोठ्या प्रमाणावर पार्क करून ठेवल्या आहेत. काही गाड्यांचा मालकांचाही पत्ता नाही. त्यामुळे अशा गाड्यांमुळे पर्यटकांच्या गाड्यांना वाहतूक करताना मोठे अडथळे निर्माण होतात तर पाचगणीकरांचे असे ओंगळवाणे दर्शन पर्यटकांच्या दृष्टीस पडते. त्यामुळे या गाड्यांना तातडीने रस्त्यावरून हटवून शहरातील रस्ते शिस्तप्रिय बनवावेत, अशी मागणी नागरिकामंधून होत आहे.
अविनाश भोसले म्हणाले, ‘बाजारपेठेतील रस्ते हे अगोदरच लहान असल्याने त्या बाजूला उभ्या असणाऱ्या वाहनामुळे हे रस्ते आणखीनच लहान बनत आहे. व वाहनांना मार्गक्रमण करताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे बऱ्याचदा वाहनचालकांमध्ये वादावादी होते.
त्यामुळे पोलीस यंत्रणेने या वाहनचालकांना सक्त ताकीद देऊन ही वाहने इतरत्र हलवण्यास सांगण्याची गरज आहे, अशा प्रकारचे निवेदन आम्ही पोलीस ठाण्याला दिले आहे. यावर पोलीस ठोण काय कारवाई करतेय, याकडे आमचे लक्ष आहे. ही वाहने तातडीने हटवली नाहीत तर मात्र आम्ही पक्षपातळीवर स्वाभिमानी रस्त्यावरही उतरून आम्ही आंदोलन छेडू. ही वाहने काढून पाचगणी शहरतील रस्त्यांनी मोकळा श्वास घेऊन पर्यटकांना व वाहनचांलकाना गाड्या चालवताना कसलाही अडथळा निर्माण होणार नाही. याची काळजी संबंधित यंत्रणेने घ्यावी.’ पाचगणीमध्ये रस्त्याच्या कडेला नादुरुस्त गाड्या रस्त्यावर उभ्या असल्याने धोकादायक ठरत आहेत. (वार्ताहर)
एकदा लावलेली गाडी कित्येक दिवस काढली जात नाही. अनेकदा महिनोंमहिने त्यावरची धूळ निघालेली नाही. यामुळे पाचगणीकरांना विशेष काही वाटत नसले तरी जगाच्या नकाशावर पाचगणीचे नाव बदनाम होत आहे. हे टाळणे गरजेचे आहे.
- नागेश कारंडे
पाचगणी
शहरात चार ठिकाणी विस्कळीतपणा
पाचगणी शहरातील नागरिकांचे जीवनमान सुधारत आहे. मात्र, शहराची भौगोलिक विस्तार कमी असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील शिवाजी चौक, टेबल लॅण्ड परिसर, बाजारपेठ, बसस्थानक या परिसरात दररोज सकाळी आठ ते दुपारी बारा व सायंकाळी पाच ते आठ या वेळेत अस्ताव्यस्त गाड्या लावलेल्या असतात. त्यामुळे बाहेरुन आलेल्या पर्यटकांना वाहने लावण्यास जागा राहत नाही. तसेच वादाचेही प्रकार अनेकदा घडत आहेत.