‘लव्ह जिहाद’ ही काल्पनिक कथा
By Admin | Updated: June 1, 2016 00:59 IST2016-05-31T23:30:41+5:302016-06-01T00:59:07+5:30
इसाक सवार : कऱ्हाडात बेकायदेशीर मोर्चा काढणाऱ्या आंदोलकांची चौकशी करा

‘लव्ह जिहाद’ ही काल्पनिक कथा
कऱ्हाड : ‘लव्ह जिहाद म्हणजे काल्पनिक कथा आहे. असे असताना काहींनी ‘लव्ह जिहाद’विरोधी मोर्चा काढला. त्यात विशिष्ट समाजाला टार्गेट करून बदनाम करण्यात आले. धर्मगुरुंवरही चुकीचे आरोप केले. याबाबात आंदोलकांनी माफी मागावी,’ असे आवाहन माजी नगरसेवक इसाक सवार यांनी केले.येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बशीर कारभारी, हाजी कच्छी, हरुण मणेर, माजी नगराध्यक्ष अल्ताफ शिकलगार, इरफान सय्यद आदी उपस्थीत होते. सवार म्हणाले, ‘प्रेम विवाह किंवा आंतरजातीय विवाह हा दोन व्यक्ती व दोन कुंटुबांचा प्रश्न आहे. त्यात समाजाला ओढण्याचा केवीलवाणा प्रकार होत आहे. शनिवारी काढलेल्या मोर्चातून विशिष्ट समाजाला टार्गेट करून केलेले आरोप अत्यंत वाईट आहेत. मुलींची छेडछाड करणारा तरुण फक्त ठराविक समाजातच असतो असे नाही. आंतरजातीय विवाह हा सगळ्याच समाजाला भेडसवणारा प्रश्न आहे. मात्र आंतरजातीय विवाहाला शासनाने मान्यता व प्रोत्साहनही दिले आहे. त्यामुळे आपण काढलेला मोर्चा संविधानाला धरून आहे, असे वाटत नाही. वास्तविक, ‘लव्ह जिहाद’ हेच खरे काल्पनिक आहे. त्याला कोणताही आधार नाही. मात्र तरीही विनाकारण त्याला घेऊन होणारी चर्चा निराधार आहे.’‘पोलिसांना निवेदन देण्यासाठी जो जमाव जमला होता, तोही बेकायदेशीर होता. त्या सगळ्याचीच सखोल चौकशी करावी. समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. आंदोलकांनी दिलेल्या निवेदनानुसार त्यांनी त्यात धर्मगुरुंची बदनामी होईल, अशा शब्दात त्यांचा उल्लेख केला आहे. तो अत्यंत चुकीचा आहे. यापुढे धर्मगुरुंची अशी बदनामी सहन केली जाणार नाही. आम्ही त्याचा निषेध करतो. आमचा निषेध हा केवळ शनिवारी मोर्चावेळी दिलेल्या निवेदनाबाबतच आहे. अन्य कोणत्याही व्यक्ती अथवा धर्माबाबत आमचे काहीही म्हणणे नाही. त्यामुळे धर्मगुरुंबाबत केलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी धर्मगुरुंची जाहीर माफी मागावी. सामाजिक तेढ निर्माण करू पाहणाऱ्या शक्तींवर पोलिसांनी कडक कारवाई करावी,’ अशी मागणीही सवार यांनी केली. (प्रतिनिधी)