ऊसदरावरच ठरणार यंदाच्या हंगामाचे भवितव्य
By Admin | Updated: November 1, 2015 00:05 IST2015-10-31T23:26:43+5:302015-11-01T00:05:04+5:30
जिल्ह्यात गाळपाचा शुभारंभ : एकरकमी दर देण्याची शेतकऱ्यांची कारखान्यांकडे मागणी

ऊसदरावरच ठरणार यंदाच्या हंगामाचे भवितव्य
वाठार स्टेशन : दसऱ्याच्या मुहूर्तावर अग्निप्रदीपन झाल्यानंतर गाळप हंगामासाठी सर्वच कारखाने सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात चालू हंगामात ६८ ते ७० लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट राहणार असून यासाठी जिल्ह्यातील एकूण १३ कारखान्यांनी साखर आयुक्ताकडे गाळप हंगामाचा परवाना मागितला आहे. आत्तापर्यंत न्यू फलटण शुगर व स्वराज इंडिया या कारखान्यांनी गाळपाचा शुभारंभ केला आहे, तर उर्वरीत ११ कारखान्यांचा गाळप हंगाम नोव्हेंबर महिन्यात सुरु होणार आहे.
गत वर्षीच्या गाळप हंगामात ऊसदराबाबत झालेली शेतकऱ्यांची दयनीय अवस्था पहाता चालू वर्षी ऊसदराबाबत शासनाची भूमिका काय राहणार? याबाबत शासन मध्यस्थी करणार का, हा प्रश्न शेतकऱ्यापुढे आहे. केंद्राने जाहीर करुनही जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक कारखान्यांनी अद्याप ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेली नाही. असे असताना आता नवीन गाळप हंगामाचा प्रारंभ झाला आहे. चालू हंगामासाठी शासनाने ९.५० साखर उताऱ्यासाठी २३०० व पुढील प्रत्येक टक्क्यासाठी २४२ याप्रमाणे एफआरपी जाहीर केली आहे. सातारा जिल्ह्यात गेल्या हंगामात १२ ते १३ असा साखर उतारा राहिला आहे. तोडणी वाहतून ५५० रुपये खर्च वजा जाता चालू हंगामात २५०० रुपयापर्यंत दर कारखान्यांना द्यावा लागणार आहे. हा दर एकरकमी मिळावा, ही शेतकऱ्यांची व शेतकरी संघटनांची भूमिका आहे, मात्र हा दर तीन टप्प्यात देण्याबाबत कारखानदार विचाराधिन आहेत. (वार्ताहर)
वाढती कारखानदारी
अन् दराची स्पर्धा
जिल्ह्यातील अनेक तालुक्यात आजही दुष्काळी परिस्थिती भीषण असल्यामुळे उसाच्या क्षेत्रात व उत्पादनात घट होणार आहे. अशा परिस्थितीत अनेक खासगी कारखाने ऊस मिळविण्यासाठी ऊस उत्पादकांना खुश करण्याची भूमिका घेतील. काही खासगी कारखान्यांकडून काटा पेमेंट देण्याच्या हालचाली सुरु आहेत. एकूणच वाढलेल्या खासगी कारखानदारीमुळे असणारे ऊसक्षेत्र या कारखान्यांना कमी पडणार आहे. यासाठी कारखान्यांना ऊसदराच्या स्पर्धेत उतरावे लागणार, हे निश्चित आहे.
...अन्यथा शेवटच्या टप्प्यात
उसाची होणार पळवापळवी
चालू हंगामात जिल्ह्यातील असणाऱ्या प्रतिदिन गाळप क्षमतेत १५ ते २० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप अधिक होणार असल्याने या हंगामात एकूण १३ कारखान्यांतून जवळपास ५० हजार मेट्रिक टन गाळप प्रतिदिन अधिक होणार आहे. यामुळे अंतिम टप्प्यात उसाची पळवापळवी होणार आहे. २०१४-१५ या हंगामात ज्या कारखान्यांनी समाधानकारक ऊसदर दिला आहे, त्यांनाच ऊस देण्याची शेतकऱ्यांची भूमिका राहणार आहे. अन्यथा उसाअभावी कारखाने अडचणीत येण्याची परिस्थिती असणार आहे.