अधिसूचना रद्द होईपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:51 IST2021-06-16T04:51:40+5:302021-06-16T04:51:40+5:30
वडूज : खटाव तालुक्यातील मायणी पक्षी संवर्धन राखीव क्षेत्रामधून समूह क्र. २ मधील येरळवाडी तलावाचा समावेश विरोधी ...

अधिसूचना रद्द होईपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार
वडूज : खटाव तालुक्यातील मायणी पक्षी संवर्धन राखीव क्षेत्रामधून समूह क्र. २ मधील येरळवाडी तलावाचा समावेश विरोधी आमरण उपोषण सुरू असून अधिसूचना रद्द होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याच्या मताशी आंदोलनकर्ते ठाम राहिल्याने प्रशासनाची घोर निराशा झाली. अखेर प्रशासन आणि येरळवाडी बचाव समिती यांच्यातली बैठक निष्फळ ठरली.
मायणी पक्षी संवर्धन राखीव मधून येरळवाडी तलाव रद्द करावा, यासाठी बनपुरी, ता. खटाव येथील भवानीमाता मंदिरात बसलेल्या उपोषणकर्त्यांशी चर्चा करताना प्रांताधिकारी जनार्दन कासार, तहसीलदार किरण जमदाडे व वनक्षेत्रपाल शितल फुंदे यांसह विविध गावांतील शेतकरीही उपस्थित होते.
मायणी पक्षी संवर्धन राखीव समूह क्रमांक दोनमध्ये येरळवाडी तलाव समाविष्ट कसा झाला, याची माहिती मिळावी, अशी मागणी येरळवाडी बचाव समितीने केली असता वनविभागाचे अधिकारी यांची काही काळ तारांबळ उडाली. तर ३५० उपसा सिंचन योजना आणि नळ पाणीपुरवठा योजना, गाळपेर, मासेमारी आणि पशुधन यांचे हक्क कायमस्वरूपी अबाधित ठेवण्यासाठी जारी करण्यात आलेली अधिसूचना रद्द झाली पाहिजे, अशी एकमुखी मागणी आंदोलनकर्त्यांमधून यावेळी करण्यात आली. अन्यायाविरोधात लढा देण्यासाठी स्थानिक लोक व शेतकरी वर्ग अधिसूचना विरोधी पेटून उठले आहेत. सदरचे आंदोलन म्हणजे लोकांचे मूलभूत अधिकार व हक्क अबाधित राखण्याचा लढा उभारला आहे. त्यामुळे शासनाला जाग आणण्यासाठी आमरण उपोषण सुरू ठेवण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही, असे मत ही आंदोलनकर्त्यांमधून व्यक्त करण्यात आले. या आंदोलनात बाळासाहेब पोळ, नाना पुजारी, नवनाथ पोळ, बाबासाहेब बागल, हणमंत देशमुख, विजय बागल, बापूराव देवकर, गोपीनाथ शिंदे, विजय देवकर, लक्ष्मण काळे, सोमनाथ पाटील, शंकर देवकर, मोहन बागल, हणमंत इनामदार आदी शेतकरी उपोषणाला बसले आहेत. तर अंबवडे, येरळवाडी, बनपुरी, नढवळ गावच्या शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळी जाऊन पाठिंबा जाहीर केला. प्रशासन व आंदोलनकर्ते यांच्यातील चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरली असली तरी बुधवार दि.१६ रोजी दुपारी बारा वाजता चर्चेची दुसरी फेरी होणार आहे.
दरम्यान, हरणाई उद्योग समूहाचे विश्वस्त मोहनभाऊ देशमुख, जिल्हा नियोजन समिती सदस्य नंदकुमार मोरे, माजी सभापती संदीप मांडवे, नगरसेवक शहाजीराजे गोडसे, उपसरपंच विजय शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पाटील आदींसह खटाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने या उपोषणाला आंदोलनस्थळी जाऊन जाहीर पाठिंबा देण्यात आला.
फोटो: मायणी पक्षी संवर्धन राखीव मधून मधून येरळवाडी तलाव रद्द करावा यासाठी बनपुरी ता. खटाव येथील भवानीमाता मंदिरात बसलेले उपोषणकर्त्यांशी प्रांताधिकारी जर्नादन कासार यांनी चर्चा केली. (शेखर जाधव )
फोटो नेम : १५वडूज