अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:08 IST2021-01-08T06:08:23+5:302021-01-08T06:08:23+5:30
खटाव : अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतातुर, तर हातातोंडाशी येत असलेले रब्बी पीक या वातावरणामुळे धोक्यात आले आहे. रब्बी हंगामातील ...

अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत!
खटाव : अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतातुर, तर हातातोंडाशी येत असलेले रब्बी पीक या वातावरणामुळे धोक्यात आले आहे. रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, कांदा, आदी पिकांवर या वातावरणाचा परिणाम होत असल्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. या आधी वातावरणात सतत होणाऱ्या बदलामुळे पिकावर किडीचा प्रादुर्भाव दिसून येत होता. धुक्यामुळे गव्हावर तांबेरा, हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, तर कांद्यावर करपा व टाका रोग पडल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा औषधे फवारणीकरिता कंबर कसावी लागणार आहे. थंडीला सुरुवात झाल्यामुळे रब्बी पिकाला पोषक वातावरण असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. रब्बी पिकाच्या आशाही पल्लवित झाल्या होत्या; परंतु अचानक पावसाळी वातावरण व पडलेला पाऊस या आगाप असलेल्या ज्वारी पूर्णपणे आडवी झाली आहे. त्यामुळे रब्बी पीक जोमात येऊन सुद्धा या वातावरणामुळे कोमात जाण्याची भीती शेतकऱ्याला लागली असून, या पिकांना वाचविण्यासाठी आता कृषीच्या दुकानात कीटकनाशक औषधे खरेदीसाठी शेतकऱ्याची गडबड सुरू झाली आहे. नेहमीप्रमाणेच निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेकऱ्याचे तोंडचे पाणी पळविले आहे, तर रब्बीच्या आस धरून बसलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
०६खटाव पीक
फोटो : अवकाळी पावसामुळे खटावमधील बहुतांश शेतातील ज्वारी पिके आडवी झाल्याने रब्बी ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे.