कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
By Admin | Updated: February 25, 2016 01:14 IST2016-02-25T01:09:34+5:302016-02-25T01:14:44+5:30
माण तालुक्यातील बिदल येथील घटना

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
दहिवडी : माण तालुक्यातील बिदाल येथील दिनकर बाबूराव बोराटे (वय ५५) या शेतकऱ्याने कर्जबाजारी-पणाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली. फुलेनगर परिसरातील या घटनेमुळे खासगी सावकारीचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दहिवडीतील एका पतसंस्थेकडून त्यांनी अडीच लाखांचे कर्ज घेतले होते; तर खासगी सावकाराकडूनही बोराटे यांनी दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. ही कर्जे फेडण्यासाठी त्यांनी आपली दोन एकर जमीन विकली होती. तरीही कर्ज न फिटल्याने ते चिंतेत होते.
गेली दोन वर्षे शेतात उत्पन्न न मिळाल्याने मंगळवारी (दि. २३) बोराटे यांनी घराशेजारीच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. घटनेनंतर त्यांना आधी दहिवडी आणि नंतर कोरेगावला उपचारांसाठी नेण्यात आले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात याची नोंद झाली नव्हती.