मजूर तुटवड्यामुळे शेतकऱ्यांचा पैरा !

By Admin | Updated: May 6, 2015 00:14 IST2015-05-05T21:42:37+5:302015-05-06T00:14:30+5:30

शामगाव परिसरातील चित्र : एकत्रित येऊन केली जातायत शेतीची कामे; ग्रामस्थांत एकोपा वाढण्यास मदत

Farmer's para due to labor trouble! | मजूर तुटवड्यामुळे शेतकऱ्यांचा पैरा !

मजूर तुटवड्यामुळे शेतकऱ्यांचा पैरा !

शामगाव : शेती कामासाठी सध्या मजुरांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. तसेच उपलब्ध असणाऱ्या मजुरांचा दिवसभराच्या मजुरीचा खर्चही शेतकऱ्यांना परवडत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शामगाव विभागातील अनेक शेतकऱ्यांनी पुन्हा जुनी ‘पैरा’ व ‘इर्झीक’ पध्दत वापरण्यास सुरूवात केली आहे. या पद्धतीमुळे मजुरांचा प्रश्न मिटत असून कामेही गतीने होत आहेत. शेतीची कामे करीत असताना मनुष्यबळाची जास्त गरज असते. शेतीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडते. वेळी-अवेळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. या गडबडीत मजूर मिळत नाहीत. मिळालेच तर ते तेवढ्या गतीने कामही करीत नाहीत. त्यामुळे फक्त पैशाचा अपव्यय होतो व कामही वेळेत होत नाही, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. पूर्वी यांत्रिकीकरण नव्हते तेव्हा बैलमालक एकत्र येऊन ‘पैरा’ पध्दत किंवा ‘इर्जिक’ पध्दतीने शेतीची कामे करीत. पूर्वी संकरीत बियाणे नसतानाही उत्पन्न भरघोस निघायचे. तसेच शेतीची नांगरट, कुळवट, फणनी, कोळपणी, धान्य वाहतूक, धान्य मळणी आदी सर्व कामे बैलाच्या सहाय्याने केली जात होती. प्रत्येक शेतकऱ्याकडे किमान एक तरी बैल असायचा. चार शेतकरी एकत्र येवून पैरा पध्दतीने किंवा इर्झीक पध्दतीने कामे करीत. या पध्दतीत ज्या शेतकऱ्यांचे काम करायचे आहे त्यांच्यात इतर सर्वांनी एकत्र येवून दिवसाचे काम काही तासातच संपवायचे. त्या घरच्या महिलांनी सर्वांसाठी पुरणपोळीसारख्या गोडधोड जेवणाचा बेत करायचा. सर्व काम करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचदिवशी संध्याकाळी जेवण द्यायचे, अशी पूर्वी पद्धत होती. एकमेकांना द्यायला पैसाच नसल्याने ही पद्धत अवलंबली जायची. पैरापध्दतीत कधीकधी एकमेकांच्यात दिवस मोजून काम करायचे. सर्वांच्यात समान दिवस काम करण्याची पद्धत होती. त्याचबरोबर काम करणाऱ्या मजुराला पैशांऐवजी धान्य रूपात किंवा वस्तूरूपात मोबदला दिला जायचा.
गत काही वर्षात यांत्रिकीकरणामुळे शेतीकामाच्या पद्धतीतही बदल झाला. मजूरी पैशात मोजली जाऊ लागली. बैलांऐवजी शेतीची मशागतीची कामे ट्रॅक्टर किंवा इतर यत्रांच्या सहाय्याने केली जाऊ लागली. त्यामुळे कामांना गती आली आहे. यांत्रिकीकरणामुळे माणूस आळशी बनला. त्यामुळे वेळेवर व अंग मोडून काम करणारे मजूर मिळत नाहीत. सर्वच ठिकाणी मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पैरा पद्धत अवलबंली जात असल्याचे दिसते. शामगाव परिसरात पेरणीपासून ते काढणी, मळणी व वैरण लावण्यापर्यंत तरूण एकत्रित येऊन काम करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Farmer's para due to labor trouble!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.