शेतात नाही शेतकरी... चोरटयांनी उचलल्या मोटारी
By Admin | Updated: July 4, 2014 00:33 IST2014-07-04T00:31:30+5:302014-07-04T00:33:53+5:30
पिंपोडे बुद्रुक : दुष्काळामुळे चोऱ्यांच्या संख्येत वाढ

शेतात नाही शेतकरी... चोरटयांनी उचलल्या मोटारी
पिंपोडे बुद्रुक : सध्या दुष्काळसदृश परिस्थिती असल्यामुळे अनेक विहिरींमध्ये पाणीच उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकरी शेताकडे जाण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. याच संधीचा फायदा घेऊन चोरटे हातसफाई करीत आहेत. दोन-तीन दिवसांपूर्वी सोळशी, नायगाव, नांदवळ परिसरात अशी कृषी साहित्यांची चोरी होण्याचे प्रमाण वाढले होते. बंद घरातून ऐवज लंपास, मोटारसायकल, सायकल, कृषी साहित्य आदी प्रकारच्या चोऱ्यांमध्ये पिंपोडे बुद्रुक आणि परिसरामध्ये वाढ झालेली असून, भुरटे चोर ‘खाकी’च्या निष्क्रियतेचा फायदा उठवत आहेत. यामुळे नागरिकांना घर बंद करून बाहेरगावी जाणेही अडचणीचे झाले आहे. वाठार स्टेशन पोलीस ठाण्याअंतर्गत ४७ गावांचा परिसर आहे. सोळशी, नायगाव, नांदवळ, रणदुल्लाबाद, सोनके, करंजखोप, चौधरवाडी, वाघोली सर्कलवाडी, पिंपोडे बुद्रुक, दहिगाव, घिगेवाडी, भावेनगर आदी गावांमधून भुरट्या चोऱ्यांमध्ये वाढ झालेली आहे. यामध्ये चोरट्यांचे बंद घर हे मुख्य ‘लक्ष्य’ बनले आहे. त्याचबरोबर घरासमोर लावलेली सायकल, मोटारसायकल या वाहनांच्या चोऱ्यांचे प्रमाणही वाढू लागले आहे. त्यामध्ये विहिरीवरील विद्युत पंप, स्प्रिंकलर पाईप, बोअरवरील केबल, मेन स्वीच, अॅटो स्टार्टर अशा वस्तूही चोरी होऊ लागल्या आहेत. काही दिवसांपासून चोरट्यांनी कृषी साहित्याकडेही आपला मोर्चा वळविला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण बनले झाले आहे. या घटनांवर अंकुश लावण्यासाठी पोलिसांनी ठोस पाऊले उचलावी, अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे. (वार्ताहर)