गव्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार

By Admin | Updated: November 26, 2015 23:55 IST2015-11-26T23:23:54+5:302015-11-26T23:55:11+5:30

महाबळेश्वरजवळ घटना : संतप्त ग्रामस्थांची वन कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की

Farmers killed in the attack | गव्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार

गव्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार

महाबळेश्वर : येथून बारा किलोमीटर अंतरावरील देवाळीमुऱ्हा गावाजवळ रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार झाला. या घटनेनंतर संतप्त झालेले ग्रामस्थ पंचनाम्यासाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेले आणि त्यांना धक्काबुक्की केली, तसेच सरकारी गाडी उलथवून टाकण्यात आली.
अख्तर कादर शारवान (वय ४३) असे गव्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. गुरुवारी (दि. २६) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अख्तर कादर शारवान हे गुरुवारी सायंकाळी त्यांच्या स्ट्रॉबेरीच्या शेतात काम करीत होते. यावेळी त्यांच्यावर रानगव्याने अचानक हल्ला चढविला. हल्ल्यात शारवान यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती समजल्यावर नातेवाइकांसह स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली. दरम्यान, ही माहिती वनखात्याला समजल्यावर या विभागाचे कर्मचारी अधिक माहिती घेण्यासाठी तसेच पंचनाम्यासाठी गावात गेले. मात्र, या घटनेमुळे संतप्त झालेले ग्रामस्थ कर्मचाऱ्यांवर धावून गेले. सरकारी गाडी उलथवून टाकण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून वाई, महाबळेश्वर पोलीस तत्काळ घटनास्थळी धावून आले. त्यांनी ग्रामस्थांना समजावून वन कर्मचाऱ्यांची सुटका केली. शारवान यांंचा मृतदेह विच्छेदनासाठी महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात आणला. (प्रतिनिधी)

उपद्रवाने ग्रामस्थ त्रस्त
ग्रामस्थांनी रानगव्यांच्या उपद्रवाबाबत वनविभागाकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. रानगव्यांचे कळप स्ट्रॉबेरी व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असून, गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी अनेकदा झाली आहे. या मागणीकडे वनविभागाने दुर्लक्ष केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून, आता गव्याने शेतकऱ्यावरच हल्ला केल्याने त्यांचा संताप अनावर झाला. ‘आणखी किती शेतकऱ्यांचे बळी जाणार,’ अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Web Title: Farmers killed in the attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.