फटाके फोडल्यानंतरच शेतात शेतकरी करतोय ‘एन्ट्री’
By Admin | Updated: August 26, 2015 21:21 IST2015-08-26T21:21:00+5:302015-08-26T21:21:00+5:30
जीव वाचविण्यासाठी नवा फंडा : जंगली श्वापदांचा मानवी वस्तीकडे मोर्चा

फटाके फोडल्यानंतरच शेतात शेतकरी करतोय ‘एन्ट्री’
ढेबेवाडी : नैसर्गिक वृक्षांच्या जंगलात मानवनिर्मित पवनऊर्जा प्रकल्पांची जंगले निर्माण झाल्याने पाटण तालुक्यातील वाल्मीक परिसरातील वनसंपदा नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. पवनऊर्जा प्रकल्पाच्या भिरभिरणाऱ्या पात्यांचा आवाज आणि बेकायदा शिकारीचे वाढते प्रमाण वन्यप्राण्यांच्या जीवनावर उठल्याने सैरभैर झालेल्या वन्य पशुपक्ष्यांनी आपली पावले मानवी वस्तीकडे वळवली आहेत. दरम्यान, फटाके फोडूनच शेतकरी शेतात जात आहेत.सातारा, सांगली, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांची हद्द म्हणजे पाटण तालुक्यातील वाल्मीक पठार! ढेबेवाडीपासून पश्चिमेला सुमारे तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या या पठाराच्या एका बाजूस चांदोली अभयारण्य तर दुसऱ्या बाजूस कोयना अभयारण्य आहे. अनेक वर्षांपासून हिरवीगार झालर पांघरलेल्या या वाल्मीक पठारावर आणि जंगलात मोठ्या प्रमाणावर पट्टेरी वाघ, बिबट्या, अस्वले, गवे, डुकरे, साळिंदर, कोल्हे आदी जंगली प्राण्यांसह पक्ष्यांचीही वर्दळ असल्याचे वनविभागाकडे नोंद असायचीया वाल्मीकच्या जंगलाची आणि तेथील पशुपक्ष्यांची संख्या कमालीची घटत चालली आहे. त्यामुळे वाल्मिक केवळ नावापुरतेच राहणार का ? असा प्रश्न पशुपक्षी तज्ज्ञांसह निसर्गमित्रांना भेडसावत आहे. (वार्ताहर)
गवे-रानडुकरांचा शेतातच मुक्काम
४विभागातील शेतकऱ्यांत वन्य प्राण्यांची कमालीची दहशत पसरली आहे. शेतात पिके मोठी झाल्याने गवे, रानडुकरांचे कळप शेतातील जुन्या राहुटीत राहू लागलेत. शेतात काम करताना अचानक अशा प्राण्यांचे दर्शन होऊ लागल्याने शेतकऱ्यांनी आता नवा फंडा शोधला आहे. शेतात प्रवेश करताना फटाके फोडायचे. ज्यामुळे त्याच्या आवाजाने शेतातील प्राणी धूम ठोकतात.
वन्यप्राणी आणि वनसंपदेची जबाबदारी जरी वनविभागाची असली तरीसुध्दा सुज्ञ नागरिकांनी चोरट्या शिकारीची चाहूल लागताच आमच्याशी संपर्क साधल्यास चोरट्या शिकाऱ्यांचा बंदोबस्त करणे सोपे जाईल.
- किरण कांबळे, वनक्षेत्रपाल