मौनाचा होतोय स्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:46 IST2021-09-08T04:46:45+5:302021-09-08T04:46:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनाने अनेकांच्या आयुष्यात उलथापालथ घडविली आहे. आर्थिक कारणांसह समाजिक ताणामुळे आलेली हतबलता अव्यक्त राहण्याचा ...

An explosion of silence | मौनाचा होतोय स्फोट

मौनाचा होतोय स्फोट

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोनाने अनेकांच्या आयुष्यात उलथापालथ घडविली आहे. आर्थिक कारणांसह समाजिक ताणामुळे आलेली हतबलता अव्यक्त राहण्याचा फटका अनेकांना बसू लागला आहे. मौनाचा स्फोट झाल्याने आयुष्य संपविण्याचा विचार डोक्यात घोळू लागल्याने अनेकांना

कोरोना संक्रमणापासून अनेक समस्यांना प्रारंभ झाला आहे. अनेकांचा रोजगार गेला, व्यवसाय बुडाला आणि आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोनाने निर्माण झालेली परिस्थिती या आधी कधीही निर्माण झालेली नव्हती. जागतिक स्तरावर याचे पडसाद उमटले असून, आर्थिक चक्र थांबले आहे. मुलांचे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. गेल्या दीड वर्षापासून ही मुले घरात आहेत. त्यामुळे मुले आणि पालक यांच्यात खटके उडतायत. आर्थिक स्थैर्य नसलेल्या कुटुंबप्रमुखांना आलेला ताण मोठा आहे. मात्र, घरातून मानसिक आधार मिळत नसल्याने त्यातून अशा व्यक्तींची घुसमट होऊ लागली आहे. सामाजिक संपर्क कमी झाल्याने व्यक्त होण्याचे व्यासपीठ मिळत नसल्यानेही अनेकांची कुचंबणा होत आहे.

ही आहेत तणावाची लक्षणे

नैराश्य, भीती वाटणे आणि अचानक राग येणे

पाठदुखी, डोकेदुखी, जबड्यात वेदना, अस्थीसंबंधातील समस्या

दीर्घकालीन तणावांची अनभिज्ञता

हिंसक व आत्महत्येची वृत्ती बळावणे, दीर्घकालीन तणावांमुळे गंभीररीत्या कोलमडणे.

उच्च रक्तदाब, छातीत दुखणे, मायग्रेन, हृदयाच्या समस्या वाढणे.

आयुष्य संपवून हासील काय?

आयुष्यात आर्थिक गणिते कोलमडतात, तिथे संसाराची घडी विस्कटते, हे सत्य आहे. तरीही आयुष्याची गणिते सोडवायला स्वत:चे आयुष्य पणाला लावण्याचा विचार करणेही योग्य नाही. आपल्या जाण्याने केवळ आपलेच आयुष्य संपणार आहे, हे सत्य आहे. याबरोबरच ज्या कारणासाठी तुम्ही आयुष्य संपविण्याचा विचार करताय तो प्रश्न तुमच्या जाण्यानेही सुटणार नाही, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे आलेल्या संकटाला धीराने सामोरे जाणे ही भूमिका ठेवणे आवश्यक बनते.

कोट

कोरोनामुळे व्यक्तींमधील संवाद तुटला आहे. मात्र, मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी व्यक्तींमध्ये सुसंवाद होणे गरजेचे आहे. त्यासाठी मनातील विचारांचा निचरा व्हायला हवा. सध्या बाहेर जाणे होत नसले तरीही मनातील विचार डायरीत नोंदवायला हवेत. आत्मकेंद्री न राहता व्यक्त होणे हाच उत्तम उपाय आहे.

-डॉ. अनिमिष चव्हाण, मनोविकारतज्ज्ञ

व्यक्त होणे महत्त्वाचे!

मानसिक स्वास्थ्य बिघडण्यासाठी तणाव हे मुख्य कारण आहे. हे ताण दूर करण्यासाठी कोणाकडे तरी मन मोकळे करायला हवे. भावना व्यक्त करायला हव्यात. काही व्यक्तींना मन मोकळे करणे कमीपणाचे वाटते. तणावाशी सामना करण्यासाठी संवाद गरजेचा असतो. प्रसंगी मानसोपचारतज्ज्ञांचे समुपदेशन घेतल्यास तणावमुक्त होण्यासाठी मदत होते. प्रत्यक्ष संवाद थांबल्यानेही अनेकांची घुसमट होत असल्याचे पुढे आले आहे. विविध प्रकारच्या कलहातून विसंवाद होत आहेत. यातून मानसिक स्वास्थ्य बिघडू लागले असल्याने अनेकांना मानसिक आजारांना सामोरे जावे लागत आहे.

Web Title: An explosion of silence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.