तिरडीची लाकडं अन् कापडं स्मशानातून हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 23:01 IST2019-04-28T23:01:10+5:302019-04-28T23:01:15+5:30
सातारा : प्रत्येकाच्या आयुष्यातील अंतिम सत्य मृत्यू असून, त्याचा शेवट स्मशानभूमीत होतो. प्रत्येकाला एक दिवस तेथे जायचंच आहे; पण ...

तिरडीची लाकडं अन् कापडं स्मशानातून हद्दपार
सातारा : प्रत्येकाच्या आयुष्यातील अंतिम सत्य मृत्यू असून, त्याचा शेवट स्मशानभूमीत होतो. प्रत्येकाला एक दिवस तेथे जायचंच आहे; पण त्याकडेच दुर्लक्ष होते. हेच लक्षात घेऊन जिल्ह्यातील ४९ स्मशानभूमींची रविवारी स्वच्छता करण्यात आली. यामध्ये २ हजार ५२६ सदस्यांनी सुमारे ११६ टन कचरा गोळा केला. स्मशानभूमीत पडलेले तिरडीवरची लाकडे, उशा अन् पूजेच्या वस्तूंसह पालापाचोळा काढला.
रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथील महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे सातारा जिल्ह्यात रविवारी सकाळी सात ते नऊ या वेळेत ४९ ठिकाणच्या दफनभूमी व कोरेगाव, पाचगणी येथील स्मशानभूमीत स्वच्छता अभियान राबविले.
दफनभूमी स्वच्छता अभियानांतर्गत ७० एकर ६ गुंठे क्षेत्रात तब्बल २ हजार ५२४ सदस्यांनी ११६.५ टन कचरा गोळा करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली. बहुतांशी ठिकाणी मुस्लीम, ख्रिश्चन, तसेच लिंगायत, तेली समाजातील बांधवांनीदेखील सहभाग घेतला होता.
प्रतिष्ठानमार्फत जिल्ह्यात प्रथमत:च हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविला गेला. दरम्यान सातारा, कोरेगाव, कºहाड, पाटण, वाई, माण, खटाव, जावळी, महाबळेश्वर आदी ठिकाणी ४९ दफनभूमीत स्वच्छता अभियान यशस्वीरीत्या राबविण्यात आले. स्मशानभूमी आसपासचा परिसर स्वच्छ करण्यात आला. याच महिन्यात स्मशानभूमींची स्वच्छता करण्याचा संकल्प जिल्ह्यात पहिल्यांदाच राबविण्यात आला होता. त्यावेळी दोनच तासांत अडीच हजार सदस्यांकडून ६१ टन कचरा गोळा करण्यात आला होता.
कचरा एकत्रित गोळा करून त्याची योग्य त्या प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली. तसेच त्या ठिकाणी आसपास मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या झाडाझुडपांना बाजूला करण्यात आले. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रतिष्ठानच्या सदस्यांकडून करण्यात आली होती. तसेच मास्क व हातमोजे प्रतिष्ठानकडून पुरविण्यात आले होते. प्रतिष्ठानच्या सदस्यांनी खराटे, दांताळे, घमेली, खोरे, पंजे आदी आवश्यक साहित्य स्वत: आणले होते.
येथे राबले
असंख्य हात
कºहाड, कोळे, काले, उंब्रज, मसूर, विद्यानगर, तारळे, पाटण, नाटोशी, मल्हारपेठ, कोरेगाव, रहिमतपूर, संगममाहुली, नेले, नांदगाव, अतीत, कोपर्डे, गजवडी, परळी, भुर्इंज, वेळे, ओझर्डे, परखंदी रोड, पसरणी, बावधन, रायगाव, कुडाळ, पाचगणी, निमसोड, औंध, वडूज, पुसेसावळी, खातगुण, पुसेगाव, दहिवडी, म्हसवड आदी ठिकाणच्या ४९ दफनभूमींची एकाच वेळी स्वच्छता करण्यात आली.
मुस्लीम तसेच इतर समाजबांधवांकडून कौतुक
दफनभूमी स्वच्छता अभियानात गावातील ग्रामस्थ, प्रतिष्ठित व्यक्ती तसेच ज्येष्ठ नागरिक यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य जगाला मानवतेचा संदेश देणारा आहे, असे भावोद्गार काढून अनेकांनी प्रतिष्ठानचे कौतुक केले. तसेच यापुढे आपली स्मशानभूमी स्वच्छ ठेवण्याचा अनेकांनी निर्धार केला.
तालुका सदस्य गोळा कचरा संख्या टनात
सातारा ५५७ १७.७
जावळी १७९ ५
कोरेगाव १९२ ७.१
माण १११ ७.५
खटाव २४६ १७.५
वाई ३१२ १५.३
कºहाड ६९१ ३४.९
पाटण १९६ ९.४
पाचगणी ४० २.१
एकूण २,५२४ ११६.५