जास्तीचे पाणी वाढवू शकते किडनीचे विकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:44 IST2021-09-23T04:44:37+5:302021-09-23T04:44:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : गरजेपेक्षा अधिकचे पाणी शरीरात गेल्याने त्याचा थेट परिणाम किडनीवर होत आहे. शरीरात जास्त पाणी ...

Excess water can aggravate kidney disorders | जास्तीचे पाणी वाढवू शकते किडनीचे विकार

जास्तीचे पाणी वाढवू शकते किडनीचे विकार

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : गरजेपेक्षा अधिकचे पाणी शरीरात गेल्याने त्याचा थेट परिणाम किडनीवर होत आहे. शरीरात जास्त पाणी गेल्यामुळे वारंवार लघवीला जाण्याचा त्रास सहन करावा लागतो. अनेकदा निद्रानाशाचा त्रासही जाणवतो. अतिरिक्त पाण्याने मानसिक आरोग्यावरही परिणाम होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी-अधिक झाल्याचे दुष्परिणामही काहींना सहन करावे लागतात.

पाणी म्हणजे जीवन हे शालेय दिवसांपासून आपल्या मनावर बिंबवले जाते. पाणी आपल्या शरीरासाठी सर्वात महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहे. निरोगी शरीरासाठी चोवीस तासांत तीन ते साडेतीन लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. मात्र ज्यांना प्रोस्टेट, हृदयरोग, मूत्रपिंडाच्या आजारांचा त्रास होतोय, अशांनी योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे. वय, वजन आणि आजाराच्या स्वरूपानुसार पाणी पिणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.

आरोग्यासाठी नियमित आणि पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. शरीरात गेलेल्या पाण्याचा उपयोग निर्मितीसाठी, पचन, शोषण, रक्ताभिसरण, शरीरातील तापमानाचे व्यवस्थापन यातील विषारी पदार्थांचे विसर्जन आधी क्रिया होण्यासाठी अत्यावश्यक असते. वैद्यकीय गैरसमजामुळे अधिक पाणी पिण्याकडे काहींचा कल असतो. किडनी सुस्थितीत ठेवायची असेल, तर भरपूर पाणी पिणे हा त्यावरील उपाय असल्याचे गैरसमज आहेत. त्यामुळे शरीराच्या गरजेपेक्षा अधिकचे पाणी पिले जाते. यामुळे शरीराला फायद्यापेक्षा नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. प्रत्येकाने आपल्या शरीराच्या गरजेनुसार पाणी प्यावे, असे डॉक्टर सुचवतात. वजन आणि वय यावरही पाणी पिण्याचे प्रमाण अवलंबून असल्याचे ते सांगतात.

चौकट

किती पाणी प्यावे

वयोगट दिवसाला किती लिटर पाणी

नवजात १

बारा वर्षांपर्यंत ५

१६ ते ३० वर्षांपर्यंत २

३१ ते ४० वर्षांपर्यंत ३

४१ ते ६० वर्षांपर्यंत ४

६१ वषार्पेक्षा जास्त ४

शरीरात पाणी कमी पडले तर

प्रत्येकाने किती पाणी प्यावे हे वैद्यकीय अधिकारी ठरवू शकत नाही. मात्र अति किंवा कमी पाणी झाले, तर त्याचा शरीराला दुष्परिणाम सोसावा लागतो. पाणी कमी प्रमाणात पिले, तर मुतखडा होण्याची शक्यता वाढते. उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यावर डीहायड्रेशन होऊ शकते. यामुळे व्यक्तीला खूप थकवा जाणवतो. थोडी मेहनत केल्यावर ही लगेच दमायला होते, याचे कारण शरिरातील पाणी पातळी कमी झालेली असते. पाण्याच्या कमतरतेमुळे बऱ्याचदा शरीरात कमी रक्तदाबाची समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

शरीरात पाणी जास्त झाले तर

वैद्यकीय गैरसमजामुळे अनेकजण किडनीचे काम उत्तमप्रकारे चालावे म्हणून जास्त पाणी पितात. त्यामुळे चालताना त्रास होऊ शकतो. गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे यामुळे किडनीवरही ताण येण्याची शक्यता असते. अधिक पाणी शरीरात गेल्याने वारंवार लघवीला जाण्याचा त्रास होतो. याचा परिणाम मानसिक आरोग्यावरही जाणवतो. निद्रानाशाच्या समस्येवर आहे जास्त पाणी पिणं काहीअंशी जबाबदार असतं.

कोट

मोठ्या व्यक्तींनी, तरुणांनी आणि ज्यांना काही आजार नाही अशांनी २४ तासांत तीन ते साडेतीन लिटर पाणी पिले पाहिजे. इतके पाणी पिल्याने मूतखडा होण्याची शक्यता कमी होते. बारीक कण लघवीवाटे निघून जातात. वय वाढल्यानंतर पाणी पिणे कमी करावे. वय वजन आणि आजाराचे स्वरूप यावर किती पाणी प्यावे, हे अवलंबून असते. हृदयविकाराच्या रुग्णांनी पाणी कमी पिले पाहिजे.

- डॉ. उदयराज फडतरे, सातारा

Web Title: Excess water can aggravate kidney disorders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.