भारतरत्न विश्वेश्वरय्या यांचा आदर्श ठेवून अभियंत्यांनी कामे करावीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:39 IST2021-09-19T04:39:54+5:302021-09-19T04:39:54+5:30
सातारा : देशाच्या तसेच राज्याच्या जडणघडणीत अभियंत्यांचे मोठे योगदान आहे. भारतरत्न सर एम. विश्वेश्वरय्या यांचा आदर्श समोर ठेवून ...

भारतरत्न विश्वेश्वरय्या यांचा आदर्श ठेवून अभियंत्यांनी कामे करावीत
सातारा : देशाच्या तसेच राज्याच्या जडणघडणीत अभियंत्यांचे मोठे योगदान आहे. भारतरत्न सर एम. विश्वेश्वरय्या यांचा आदर्श समोर ठेवून अभियंत्यांनी गुणवत्तापूर्ण व दर्जेदार कामे करावीत, असे प्रतिपादन राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात भारतरत्न सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अभियंत्यांना आदर्श अभियंता पुरस्काराचे वितरण पालकमंत्री पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, महिला व बाल विकास समितीच्या सभापती सोनाली पोळ, समाज कल्याण सभापती कल्पना खाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माधव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, आर. वाय. शिंदे आदी उपस्थित होते.
पुस्तकी ज्ञानासोबतच लोकांच्या भावना समजून कामे करावीत, असे सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘शासनाच्या अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये कामाचे स्वरूप आणि वाढलेली व्याप्ती लक्षात घेऊन रिक्त जागा भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. पुरस्कारप्राप्त अभियंत्यांच्या कामाचा आदर्श इतरांनी घेऊन अधिक चांगले काम करावे. आपले काम आयुष्यभर लोकांच्या लक्षात राहील, असे उल्लेखनीय काम करावे. ग्रामीण भागातील नागरी सुविधांची कामे दर्जेदार होण्यावर लक्ष केंद्रित करावे,’ असे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेकडील रिक्त जागा भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे कबुले यांनी सांगितले.
गौडा म्हणाले, शासन स्तरावर काम करीत असताना अभियंत्यांनी आपल्या कामाचा दर्जा अधिक चांगला ठेवला पाहिजे. कामाचा लौकिक सर्वत्र होईल, असे काम करावे.
प्रास्ताविक विधाते यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य, अभियंते व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
फोटो : १८झेडपी
फोटो ओळ : सातारा येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आदर्श अभियंत्यांचा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.