वाई परिसरातील सेवा रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:12 IST2021-02-05T09:12:08+5:302021-02-05T09:12:08+5:30

वाई : वाई शहरामधून कृष्णामाई वाहाते तर शहराच्या दोन्ही बाजूने धोम धरणाचे डावा व उजवा कालवा वाहतो. नागरी वस्तीमधून ...

Empire of waste on service roads in the Wai area | वाई परिसरातील सेवा रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य

वाई परिसरातील सेवा रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य

वाई : वाई शहरामधून कृष्णामाई वाहाते तर शहराच्या दोन्ही बाजूने धोम धरणाचे डावा व उजवा कालवा वाहतो. नागरी वस्तीमधून जाणाऱ्या कालव्यामध्ये सुशिक्षित नागरिकही कालवा म्हणजे कचरा टाकण्याचे हक्काचे ठिकाण असल्याप्रमाणे कलव्यामध्ये कचरा टाकत असतात. त्यामुळे दोन्ही कालव्यांसह सेवा रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

वाई शहरातील दत्तनगर ते सह्याद्रीनगर या भागात यशवंतनगर ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या धोम उजव्या कालव्यामध्ये तसेच कालव्याच्या शेजारून जाणाऱ्या सेवा रस्त्यावर परिसरातील नागरिक प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून कचरा, प्लास्टिक, घरात छोटे-कार्यक्रम झाल्यास पत्रावळ्या नियमित येणाऱ्या घंटागाडीत न टाकता कालवा परिसरात टाकतात. यामुळे परिसराला बकाल स्वरूप येऊन दुर्गंधी पसरत आहे. प्लास्टिक खाल्ल्याने पाळीव जनावरांनाही धोका निर्माण झाला असून, काही ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस मद्यपी बसत असल्यामुळे नागरिकांना त्रास होऊन परिसरात काचा व प्लास्टिकचे साम्राज्य होत असते. सकाळी, संध्यकाळी या परिसरात नागरिक फिरण्यासाठी येत असतात. त्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागतो. यामुळे परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तरी ग्रामपंचायतीने कचरा उचलावा व अशा प्रकारे कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

राज्यासह देशात आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असताना वैयक्तिक स्वच्छतेबरोबर सार्वजनिक स्वच्छता ही महत्त्वाची आहे. त्यानुसार शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कचऱ्याची विल्हेवाट लावण्याविषयी आचारसंहिता दिली आहे. ओला कचरा व सुका कचरा वेगळा करून त्यावर प्रक्रिया करण्यात यावी, जेणेकरून कचऱ्यामुळे होणारे प्रदूषण बंद होऊन आरोग्यास धोका पोहोचू नये. यासाठी ठराविक वेळेत ग्रामपंचायतीकडून कचरा गाड्या फिरत असून, त्यामध्येच नागरिकांनी कचरा टाकावा. सार्वजनिक स्वच्छता राखणे हे प्रशासनाबरोबर नागरिकांचे कर्तव्य आहे. याचा नागरिकांना सोयीस्कररित्या विसर पडताना दिसत आहे. तरी अशा बेशिस्तपणे कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

कोट..

दत्तनगर ते सह्याद्रीनगर या परिसरातून जाणाऱ्या धोम उजव्या कालव्यामध्ये स्वतःला सुशिक्षित म्हणणारी लोक ही सर्रास कचरा टाकतात. यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच मद्यपींचा उपद्रवही वाढला आहे. नागरिकांनी घंटागाडीमध्ये कचरा टाकावा. यशवंतनगर ग्रामपंचायतीने डोळेझाक न करता संबंधित नागरिकांवर कडक कारवाई करावी.

-विकास सावंत, नागरिक, यशवंतनगर

फोटो आहे..

३१वाई

वाई परिसरातील सेवा रस्त्यासह धोम धरणाचे डावा व उजवा कालव्यात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

Web Title: Empire of waste on service roads in the Wai area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.