घोटाळाप्रकरणी आठ संचालकांना अटक
By Admin | Updated: November 27, 2015 00:41 IST2015-11-26T23:38:09+5:302015-11-27T00:41:00+5:30
आण्णासाहेब पाटील पतसंस्था : गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

घोटाळाप्रकरणी आठ संचालकांना अटक
सांगली : जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या आण्णासाहेब पाटील सहकारी पतसंस्थेतील १२ कोटी २६ लाख ७३ हजार २९६ रुपयांच्या अपहारप्रकरणी पतसंस्थेच्या आठ संचालकांना गुरुवारी अटक करण्यात आली.आठही संचालकांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपास आल्यानंतर या विभागाच्यावतीने तातडीने आणि जलदगतीने तपास करत याप्रकरणी या आठ संचालकांना अटक केली आहे. यापूर्वी या प्रकरणातील संस्थापक-अध्यक्ष आण्णासाहेब पाटील याला अटक केली होती.
याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने सौ. मालती लक्ष्मण कोळी (वय ४८, रा. सैनिक वसाहत मागे, मिरज), रावसाहेब जयकुमार कवठेकर (५२, रा. आनंदसागर कॉलनी, मिरज), बाबासाहेब मारुती यादव (५८, रा. नवीन बायपास पूल, सांगलीवाडी), शंकर सितारा कोळी, (रा. सांगलीवाडी), सौ. कल्पना सुदाम रेंगडे (४८, रा. गणेशनगर, सांगली), जयंत नामदेव माने (५०, रा. कर्नाळ, सांगली), विशाल विलास पाटील (३५, रा. गोटखिंडी, ता. वाळवा), दयानंद विठ्ठल लोंढे (६०, रा. माजी सैनिक सोसायटी, मिरज) अशी अटक केलेल्या संचालकांची नावे आहेत. हे सर्व जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत.
या पतसंस्थेतील गैरव्यवहाराबाबत तत्कालीन विशेष लेखापरीक्षक वर्ग दोनचे अधिकारी दिलीप जयवंत जाधव यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी याचा तपास केला होता. पण त्यानंतर हा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे पाठविण्यात आला. त्यानंतर पुन्हा या तपासाला गती देण्यात आली आणि त्यामध्ये अटक असलेल्या संस्थापक-अध्यक्ष आण्णासाहेब पाटील याची चौकशी करण्यात आली. याशिवाय या पतसंस्थेचे पुन्हा एकदा लेखापरीक्षण करण्यात आले. त्यामध्ये बोगस सह्या व धनादेशाद्वारे पैसे बुडीत असलेल्या बल्लाळेश्वर पतसंस्थेत ठेवण्यात आल्याचे दाखविले. आठ जणांवर अटकेची कारवाई झाली आहे. अजून उर्वरित संचालकांनाही लवकरच अटक करण्यात येईल. (प्रतिनिधी)
तत्कालीन संचालक जबाबदार
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या हितासाठी ही पतसंस्था निर्माण करण्यात आली होती. पण या पतसंस्थेत संस्थापक-संचालक आण्णासाहेब मलगोंडा पाटील याने मोठा घोटाळा केला. या घोटाळ्याला तत्कालीन संचालक मंडळालाही जबाबदार धरण्यात आले होते.