खाद्यतेल डबा दरात पुन्हा उतार; पाऊच भाव स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:25 IST2021-06-21T04:25:13+5:302021-06-21T04:25:13+5:30
सातारा : जिल्ह्यात सलग दुसऱ्या आठवड्यात खाद्यतेलाच्या दरात उतार आला आहे. १५ किलोंच्या तेल डब्यामागे सरासरी १५० रुपये कमी ...

खाद्यतेल डबा दरात पुन्हा उतार; पाऊच भाव स्थिर
सातारा : जिल्ह्यात सलग दुसऱ्या आठवड्यात खाद्यतेलाच्या दरात उतार आला आहे. १५ किलोंच्या तेल डब्यामागे सरासरी १५० रुपये कमी झाले आहेत. सूर्यफूल, शेंगदाणा तेल डबा २,४०० पर्यंत मिळत आहे, तर एक लीटरच्या पाउचचे दर जैसे थे आहेत. त्याचबरोबर, साताऱ्यात पालेभाज्या महागच असून, वाटाणा ८ हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहोचला आहे.
सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी, कोरेगाव, माण, फलटण या तालुक्यांतून भाजीपाला येत असतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. कोरोना लॉकडाऊनमुळे शनिवारी आणि रविवारी बाजार समिती बंद होती, पण शुक्रवारी ३२५ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली होती. कांद्याची आवक झाली नसली, तरी क्विंटलला २ हजारांपर्यंत दर मिळत आहे, तर वांग्याचाही दर वाढल्याचे दिसून आले. वांग्याला १० किलोला ४०० ते ५०० रुपये दर मिळाला. टोमॅटोला ४० ते ६० रुपये आणि फ्लॉवरला १० किलोला २०० ते ३०० रुपये भाव आला. आल्याला क्विंटलला दीड हजार तर लसणाला ७ हजारांपर्यंत दर मिळाल्याचे दिसून आले.
खाद्यतेल मार्केट
मागील १५ दिवसांपासून खाद्यतेलाचे दर कमी झाले आहेत. सध्या खाद्यतेलाचा सूर्यफूल डबा २,३५० ते २,४०० पर्यंत मिळत आहे, तर पामतेलचा १,८०० ते १,८५०, शेंगदाणा तेल डबा २,४०० ते २,४५० आणि सोयाबीनचा २,१५० ते २,२५० रुपयांपर्यंत मिळत आहे, तर सोयाबीन तेल पाऊच १५०, सूर्यफूलचा १८० रुपयांना मिळत आहे.
आंबा आवक कमी
बाजार समितीत आंब्याची आवक कमी झाली. आंब्याची ८ आणि पपईची २ क्विंटल आवक झाली. त्याचबरोबर, डाळिंब, संत्रा, पेरूची आवक झाली नाही.
बटाटा फक्त स्वस्त
बाजार समितीत अनेक भाज्यांचे दर वाढले आहेत, पण बटाट्याला अद्यापही दर कमी आहे. क्विंटलला १,४०० ते १,६०० रुपये दर मिळला, तर दोडक्याला १० किलोला ४०० ते ५०० रुपये, ढबू ३०० ते ४००, शेवगा शेंग ४०० ते ५००, पावटा ६०० ते ७००, गवारला ४०० ते ५०० दर १० किलोला मिळाला.
प्रतिक्रिया
आठ महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढले होते, पण सध्या मागणी कमी आणि आवक वाढल्याने दरात उतार आला आहे. तेलाच्या डब्यामागे घट आहे, पण पाउचचे दर कमी झाले नाहीत.
- संभाजी आगुंडे,
विक्री प्रतिनिधी
कोरोनामुळे अडीच महिन्यांपासून भाजी मंडई बंद आहे. यामुळे भाजीपाला मिळविताना अनेक अडचणी होत्या. आता भाज्या मिळतात, पण दर वाढलेले आहेत. कोणतीही फळभाजी ४० रुपये किलोच्या पुढे आहे.
- रामचंद्र पवार, ग्राहक
सातारा बाजार समितीत वाटाण्याला एकदम चांगला दर मिळत आहे, तर वांगी, दोडका, शेवगा शेंग, पावटा यांनाही भाव मिळू लागलाय, पण कोबी, टोमॅटो, कांद्याला दर अजूनही कमीच मिळत आहे.
- सोपान पाटील, शेतकरी
..............................................................................................................................................................................................