पूर्वभागात राष्ट्रवादीला खिंडार!
By Admin | Updated: August 14, 2015 00:08 IST2015-08-13T22:41:11+5:302015-08-14T00:08:27+5:30
फलटण तालुका : रासप-काँग्रेस डोकेदुखी ठरणार

पूर्वभागात राष्ट्रवादीला खिंडार!
नीलेश सोनवलकर - दुधेबावी फलटण तालुक्यातील पूर्व भागातील बहुतांशी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात रासप व काँग्रेसने सत्तांतर घडवून आणल्याचे चित्र दिसत आहे. येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस व रासप राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरणार असल्याचे दिसू लागले आहे.फलटण तालुक्यातील पूर्वभागात भाजप-शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लढवत नसल्याने राष्ट्रवादीला तगडा विरोधक उरला नव्हता; परंतु ‘काँग्रेस व रासप’ने ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून आपले कर्तृत्व दाखवून दिले आहे.
यामध्ये बहुतांशी गावांमध्ये राजेगट विरुद्ध राजेगट अशीच लढत होती. मात्र, ज्या ठिकाणी राजेगट विरुद्ध काँग्रेस किंवा रासप असेल याठिकाणी निश्चितच थोडाफार का होईना बदल झालेला दिसून आला आहे. यामुळे ज्या गावामध्ये विरोधी गट कार्यरत आहे. त्याठिकाणी सत्ताधारी राष्ट्रवादीला येणाऱ्या आगामी निवडणुकामध्ये डोकेदुखी ठरणार असल्याचे दिसत आहे.
फलटण तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीमध्ये सरडे, जाधववाडी, कुरवली, टाकळवाडी या ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले. जावली ग्रामपंचायतीवर रासपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे.
फलटण तालुक्यातील झिरपवाडी, आंदरुड, कोळकी, राजुरी, गुणवरे यासह अनेक ग्रामपंचायतींमध्ये रासप व काँग्रेसने चंचू प्रवेश केला आहे.
राजुरीमध्ये धनंजय पवार यांचा गट पडून सांगळे गट सत्तेत आला आहे. तर निंबळकमध्ये राम निंबाळकर यांचा गट विजयी झाला आहे. तसेच राजाळे येथे विश्वासराव भोसले यांच्या गटाचे पानिपत होऊन राजेगट विजयी झाला आहे. तसेच सुमारे ४० वर्षांनंतर पवारवाडी येथे सत्तांतर घडवून आणण्यात राष्ट्रवादीच्याच तरुण वर्गाला यश आले आहे.
फलटण तालुक्यात सध्या झालेल्या निवडणुकीमध्ये सुमारे ७० टक्के ग्रामपंचायती तरुण वर्गाला हाती घेण्यात यश मिळाले असल्याचे दिसत आहे.
मिरढे, राजाळेत राष्ट्रवादीला यश...
भाडळीखुर्द, सासकल, तिरकवाडी, सोनवडी बु, सोनवडी खुर्द, मिरढे, आंदरुड, मुंजवडी, नाईकबोमवाडी, राजाळे, पवारवाडी, निंबळक या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीला यश मिळाले आहे.
विविध विकासकामे व तरुणांच्या पाठिंब्यामुळे ग्रामपंचतीत विजय मिळवत आला आहे. आगामी निवडणुका आम्ही पूर्ण ताकदीनिशी लढवणार आहोत.
-दिगंबर आगवणे, जिल्हाध्यक्ष स्वराज संघटना