दुष्काळग्रस्तांना रोज ६० हजार लिटर पाणी
By Admin | Updated: April 26, 2016 00:26 IST2016-04-25T22:59:22+5:302016-04-26T00:26:51+5:30
रामकृष्ण मठाची सामाजिक बांधिलकी : पेडगाव, मांडवे, तडवळेत टँकरची सेवा

दुष्काळग्रस्तांना रोज ६० हजार लिटर पाणी
सातारा : कमी पर्जन्यमान व दिवसेंदिवस वाढत चाललेल्या उष्णतेमुळे जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी जलस्त्रोत आटल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बळीराजाची ही अवस्था पाहून त्यांना दिलासा देण्यासाठी रामकृष्ण मठ, पुणे यांच्यामार्फत सातारा जिल्ह्यात दुष्काळी भागात खटाव तालुक्यातील पेडगाव, मांडवे, तडवळे या गावांत पाणी टँकर सुरू करण्यात आले आहे.
या सेवेचा प्रारंभ नायब तहसीलदार सुधाकर धार्इंजे यांच्या हस्ते करण्यात आला. या तीन गावांतील साधारण ९००० लोकांना दररोज ६० हजार लिटर पाण्याचे वाटप करण्यात येणार असून, हे सेवाकार्य जून २०१६ अखेर चालणार आहे. रामकृष्ण सेवा मंडळ, सातारा यांच्या सहकार्याने हे सेवा कार्य चालणार आहे.
या कार्यास जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, उपजिल्हाधिकारी पराग सोमण, वडूज तहसीलदार अमोल कांबळे यांनी सहकार्य केल्याचे मंडळाचे कार्यवाह नंदकुमार सावंत यांनी सांगितले. याप्रसंगी पेडगाव, मांडवे, तडवळे गावचे सरपंच, सदस्य, ग्रामस्थ, रामकृष्ण सेवा मंडळ साताऱ्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
खटाव तालुक्यातील पेडगाव, मांडवे व तडवळे येथे भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांना तसेच शेतकऱ्यांना वणवण फिरावे लागत आहे. दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी रामकृष्ण मठाच्या वतीने या तीन्ही गावांमध्ये पाण्याचे टॅँकर सुरू करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्या आनंदाचे वातावरण आहे. जून महिन्यापर्यंत हे टॅँकर सुरू राहणार आहेत. (प्रतिनिधी)