आमीरमुळे प्रशासन ‘ड्युटी’वर !

By Admin | Updated: April 17, 2016 23:33 IST2016-04-17T22:37:31+5:302016-04-17T23:33:07+5:30

‘वॉटर कप’ स्पर्धेची तयारी : सुटीच्या दिवशीही अधिकारी हजर

Due to Amir's administration! | आमीरमुळे प्रशासन ‘ड्युटी’वर !

आमीरमुळे प्रशासन ‘ड्युटी’वर !

सातारा : राज्यातील जलसंधारण चळवळीला हातभार लावण्यासाठी सध्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असलेल्या अभिनेता आमीर खानला साताऱ्यात सुखद अनुभव आला. रविवारची सुट्टी असतानाही ‘वॉटर कप’ स्पर्धेच्या निमित्ताने मंडलाधिकाऱ्यांपासून तलाठी, ग्रामसेवक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत झाडून सगळे प्रशासन ‘ड्युटी’वर हजर असलेले पाहून आश्चर्याचा सुखद धक्का बसला. मात्र, प्रशासनाची ही ‘कार्यतत्परता’ लोकप्रतिनिधींना रुचली नाही.
‘सत्यमेव जयते’ व ‘पानी फाउंडेशन’च्या राज्यातील सातारा, अमरावती अन् बीड या तीन जिल्ह्यांत जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येत आहेत. या कामांत लोकसहभाग वाढावा म्हणून ‘वॉटर कप’ स्पर्धाही घेण्यात येणार आहे. कोरेगाव तालुक्यातील (जि. सातारा) ४० गावांतील ग्रामस्थ या स्पर्धेत सहभाग घेणार आहेत. या स्पर्धेत पन्नास लाख (प्रथम), तीस लाख (द्वितीय) व दहा लाख (तृतीय) अशी बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामधील नियोजन भवनामध्ये ‘वॉटर कप’ या स्पर्धेच्या निमित्ताने जिल्ह्णातील मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आणि अधिकाऱ्यांची बैठक रविवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमीर खान बोलत होते.या चाळीस गावांशिवाय जिल्ह्णामध्ये इतर ठिकाणीही जलसंधारणाची कामे व्हावीत, या संदर्भातही या बैठकीत चर्चा झाली. स्पर्धेच्या माध्यमातून संबंधित गावामध्ये जलसंधारणाच्या कामाबरोबरच लोकांना पाणी अडविण्यासाठी प्रेरित करण्याचा मुख्य उद्देश या स्पर्धेचा आहे.
आमीर खान म्हणाले, ‘या स्पर्धेत लोकांच्या श्रमदानातून केल्या जाणाऱ्या जलसंधारण कामाला अधिक महत्त्व दिले जाणार आहे. काम कशा पद्धतीने करायचे, यासाठी प्रत्येक गावातील पाच ग्रामस्थांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. कोणत्याही कामात नियोजन केले तर ते यशस्वी होतेच, त्यासाठी एकजूट हवी. मी काही मोजकेच चित्रपट करतो; पण जे करतो, ते मनापासून आणि परफेक्ट करतो, तसे तुम्हीही हे काम परफेक्ट करा,’ असे आवाहनही यावेळी आमीर खान यांनी शासकीय कर्मचाऱ्यांना केले. यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख यांच्यासह इतरही अनेक अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)


प्रशासनाने अशीच तत्परता दुष्काळग्रस्त भागात दाखवावी
‘रविवारी सुटी असतानाही सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आमीर खान यांच्या बैठकीत ज्या उत्साहाने प्रशासन हजर झाले होते, तीच तत्परता दुष्काळी भागातील टँकर अन् छावण्यांसाठी दाखविली असती तर सध्याची भीषणता थोडीफार तरी कमी झाली असती,’ अशा भाषेत राष्ट्रवादीचे माजी मंत्री शशिकांत शिंदे आणि काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. -वृत्त/ हॅलो १

बाहेर पोलिसांचा
कडक बंदोबस्त
रविवारी आमीर खान साताऱ्यात येणार आहे, हे कोणालाच माहिती नव्हते. नियोजन भवनाबाहेर पोलिसांचा ताफा दिसू लागल्यानंतर मात्र आत कोणीतरी सेलिब्रेटी असल्याची कुणकुण सातारकरांना लागली. त्यानंतर अनेक कार्यकर्ते आत जाण्यासाठी प्रयत्न करू लागले; मात्र, ‘लोकप्रतिनिधी असो वा पत्रकार, कोणालाही आत प्रवेश नाही,’ असे स्पष्ट करून पोलिस पथकाने सर्वांनाच बाहेर काढले.

गेल्या दहा वर्षांपासून माझं साताऱ्याशी जवळचं नातं निर्माण झालं असून, आईच्या आग्रहाखातर मी पाचगणीत बंगलाही विकत घेतलाय. सातारा जिल्ह्यातील चाळीस गावांमध्ये आता काम करताना हीच आपुलकी खूप साथ देणार आहे.
- आमीर खान, अभिनेता

Web Title: Due to Amir's administration!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.