पावसाळ्यातच दुष्काळ; शेतमजूर घायकुतीला...
By Admin | Updated: August 26, 2015 21:20 IST2015-08-26T21:20:09+5:302015-08-26T21:20:09+5:30
हाताला काम मिळेना : शेतकरीही चिंतेत; अनेकजण बांधकामाच्या मजुरीवर

पावसाळ्यातच दुष्काळ; शेतमजूर घायकुतीला...
कोपर्डे हवेली : ऐन पावसाळ्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्याचा परिणाम प्रत्येक घटकावर जाणवू लागला आहे. ऐन पावसाळ्यात जिरायती क्षेत्रातील पिके करपू लागली आहेत. तर बागायती क्षेत्रातील दुष्काळाची परिस्थिती पाहून शेतकरी हवालदिल झाला असून, ऐन कामाच्या हंगामामध्ये शेतमजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांची परिस्थिती बिकट होत आहे. मजूर कामाच्या शोधात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. जुलै आणि आॅगस्ट महिना पावसाचा म्हणून ओळखला जातो. पण या महिन्यामध्ये पावसाने दडी मारल्यामुळे पेरणी झालेल्या जिरायती क्षेत्रातील पिके करपू लागली असून, येत्या चार दिवसांत पाऊस नाही पडला तर हंगाम वाया जाण्याची शक्यता आहे. भुईमूग, घेवडा, सोयाबीन, हायब्रीड आदी पिकांची वाढ खुंटली असून, पिकांचे शेंडे करपले आहेत. बागायती क्षेत्रामध्ये शेतीकाम करण्यासाठी मजुरांची टंचाई जाणवत असते; पण ऐन हंगामामध्ये पावसाने दडी मारल्यामुळे भविष्यात पाऊस पडेल की नाही, याविषयी शाश्वती नसल्यामुळे शेतात काम करण्यासाठी मजुरांचा खर्च वाचविण्यासाठी स्वत: काम करणे, भांगलणीचा खर्च वाचविण्यासाठी रासायनिक औषधांच्या फवारण्या घेणे आदी गोष्टींमध्ये वाढ केली आहे. तर पाऊस पडत नसल्यामुळे उसाची पाचट काढणे शेतकऱ्यांनी बंद केले आहे. भविष्यात पाणीटंचाई जाणवेल, या भीतीने उसाच्या लागणी बंद केल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. शेतीच्या उत्पादन खर्चात काटकसर करण्यासाठी मजुरांच्या कामामध्ये कपात करण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. महिलांच्या तुलनेत पुरुषांना काम नाही, असेच चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. बांधकाम व्यवसायामध्ये काम शोधण्यासाठी पुरुषमंडळी फिरत आहेत. तर अनेक ठिकाणची बांधकामाची कामे गतवर्षीच्या तुलनेत बंद आहेत. त्यामुळे शेतमजुरांच्या हाताला काम नाही, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घटकावर पावसाने पाठ फिरवल्याचा परिणाम दिसू लागला आहे. हॉटेल, दुकानदार, पानपट्ट्या आदींना ग्राहक नसल्याने मोठा फटका बसला आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून अनेकजण दूध व्यवसाय करत आहेत. तर अनेकांनी शेळीपालन व्यवसाय सुरू केला आहे. वैरणीची टंचाई जाणवू लागल्याने शेळ्या तसेच म्हशींची विक्री सुरू आहे. (वार्ताहर)
सर्वच घटकांवर परिणाम
शेतीत उत्पादीत होणाऱ्या माळव्याच्या मालामध्ये मोठ्या प्रमाणात घट
गावोगावच्या शेतमजुरांच्या हाताला कामच मिळत नाही
कऱ्हाड शहरासह मोठ्या गावांतील बाजारपेठेवर मंदीचे सावट
पाण्याअभावी पिके वाळल्याने जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न
प्रतिकूल हवामानामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगांचा
प्रादुर्भाव
जिरायती क्षेत्रासह बागायती क्षेत्रामधील विहिरी, बोअर यांची पाण्याची पातळी खालावली. पाण्याअभावी अनेक विहिरी कोरड्या
सध्या दुष्काळाची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. शेतामध्ये कामे नसल्याने हाताला काम नाही. अनेकजण मिळेल ते काम करून कुटुंब जगवित आहेत.
- ज्ञानेश्वर काळे,
शेतमजूर, कोपर्डे हवेली
मी जिरायती भागातील शेतकरी आहे. सध्याच्या दुष्काळामुळे शेतातील पिके करपू लागली आहेत. विहीर पाण्याअभावी कोरडी पडली आहे. पिके जगवायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- आबाजी पोळ,
शेतकरी, शामगाव