लोकसहभागातून दुष्काळ डोहात बुडविला!

By Admin | Updated: July 28, 2015 21:27 IST2015-07-28T21:27:44+5:302015-07-28T21:27:44+5:30

रामडोह, कुंभारडोह झाले वाहते : खटाव तालुक्यातील श्रीराम सागर तलाव दुथडी भरून लागला वाहू

Drought has been dashed from the people's participation! | लोकसहभागातून दुष्काळ डोहात बुडविला!

लोकसहभागातून दुष्काळ डोहात बुडविला!

वडूज : वरुड, ता. खटाव येथील कायमस्वरूपी दुष्काळावर मात करण्यासाठी आपटा शिवार येथे लोकसहभाग व ग्रामस्थांच्या सहकार्याने रामडोह, कुंभारडोह तयार केले होते. या भागात पडलेल्या पावसामुळे दोन्ही डोहांना पाणी आले असून, श्रीराम सागर तलावही दुथडी भरून वाहत आहे. येथील दुष्काळ लोकसहभागातून डोहात बुडविला असून, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.वरुड येथील आपटा शिवार येथे लोकसहभागातून नांदेडचे मन्ना महाराज यांनी खोदकाम करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर काही प्रमाणात पाणी प्रवाहित झाले होते; परंतु यासाठी यांत्रिक गरज भासल्याने मन्ना महाराज यांनी आवाहन केल्यानंतर जेसीबी, पोकलॅन व ट्रॅक्टरने उर्वरित खोदकाम सुरू केले. त्यनंतर पाण्याचा प्रवाह प्रवाहित झाले. त्यामुळे या कार्याला थोडेफार यश आले आहे.या कामात अनेक अडचणी येत होत्या. त्यावर पर्याय शोधून उपाययोजना राबविल्या जात होत्या. येथील पाणी प्रवाहित झाले; मात्र तेथे मोठ्या प्रमाणावर गाळ असल्याने तो मनुष्यबळाचा वापर करून काढणे अशक्य होते. ही बाब लक्षात घेऊन मदतीचे आवाहन करण्यात आले. प्रसिद्धीपासून कोसो दूर असणाऱ्या मन्ना महराजांना हे कार्य करून अजून पुढील कामे अपेक्षित आहेत. याठिकाणी सेवाभावी वृत्तीने दान करत आहेत. शासनाने या दुष्काळी भागात कोट्यवधी रुपये खर्चून जलसंधारणाची व जलयुक्त शिवार योजनेची कामे हाती घेतली आहेत. मात्र, अपुऱ्या पावसामुळे याठिकाणी पाणीसाठी होत नाही. मात्र, भूगर्भातील प्रवाहित पाणीसाठा ओळखून ग्रामस्थांनी दिलेले श्रमदान लाखमोलाचे ठरत आहे. (प्रतिनिधी)


या ओढ्यावरील हे खोदकाम पूर्णक्षमतेने झाल्यानंतर पाझर तलावाखालील वरुड व सिद्धेश्वर-कुरोली या गावास सुरू असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी तुडुंब भरून पाण्याचा कायमचा प्रश्न मिटणार आहे. त्याप्रमाणे दोन्ही गावांतील जिरायत व बागायती असे मिळून १७५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे या कामाला लोक सहभागाबरोबरीने शासनाची जोड मिळाली तर या दोन्ही गावांचे नंदनवन होईल.साठी कष्ट करण्याची ग्रामस्थांची तयारी आहे.
-शशिकांत जाधव
(सरपंच, वरुड)

गाडलेला ओढा पुनर्जीवित
अनेक वर्षांपासून भूगर्भात गाढलेला ओढा पुनर्जीवित करून शेकडो फुटांवर असलेला पाझर तलाव्यात हे पाणी साचून आहे. या गावाची तहान भागून कायमचा दुष्काळ हटावा, अशी ग्रामस्थांची अपेक्षा होती. पाणी साठले असून, ते प्रवाहित झाल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत.
गाळ नेण्याचे आवाहन
राम व सीतेच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या भूगर्भातील खोदकामामुळे निघालेला गाळ ग्रामस्थांनी न्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

खोलवर खोदकामामुळे येथे मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून, तो या दोन्ही गावांतील शेतकऱ्यांनी स्वखर्चाने नेल्यास हा परिसर स्वच्छ होऊन पाणी पूर्णक्षमतेने प्रवाहित होऊन वरुड व कुरोली येथील पाझर तलाव दुथडी भरून वाहतील. त्यामुळे या परिसरातील विहिरींचे पुनर्भरण होऊन शेतकऱ्यांच्या शेती पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटण्यास एक प्रकारे मदतच होणार आहे.
-ज्ञानदेव माने (शेतकरी, वरुड)

Web Title: Drought has been dashed from the people's participation!