डॉ. आंबेडकरांमुळे माणूसपण मिळाले
By Admin | Updated: November 8, 2015 23:40 IST2015-11-08T22:42:49+5:302015-11-08T23:40:07+5:30
तुलसीदास गडपायले : साताऱ्यात शाळा प्रवेश दिन साजरा

डॉ. आंबेडकरांमुळे माणूसपण मिळाले
सातारा : डॉ. आंबेडकरांनी देशाचा आणि देशातील प्रत्येक माणसाच्या उन्नयनाचा विचार करणारे संविधान भारताला दिले. त्यामुळे खऱ्या अर्थाने माणासला ‘माणूसपण’ मिळाले. समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि विज्ञाननिष्ठा ही तत्त्वमूल्ये संविधानाने दिली. ही महत्त्वपूर्ण आहेतच; परंतु शिक्षणासंबंधी संविधानात धरलेला सक्तीचा आग्रह खूप महत्त्वाचा आहे. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपण नीटपणे समजून घेतले पाहिजेत,’ असे विचार भारतीय आयुर्विमा महामंडळाचे वरिष्ठ मंडल प्रबंधक तुलसीदास गडपायले यांनी व्यक्त केले.
सातारा येथे छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रमिक मुक्ती दलाचे प्रणेते डॉ. भारत पाटणकर होते. तर प्राचार्य डॉ. संजय कांबळे, प्रतापसिंह हायस्कूलच्या मुख्याध्यापिका एस. जी. मुजावर व सोहळ्याचे आयोजक अरुण जावळे यांची उपस्थिती होती.
माणसाला माणसाने माणसासारखे वागवले पाहिजे. हा मानवतेचा तथागत गौतम बुद्धांचा संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिला. हा संदेश केवळ विशिष्ट समाजसमूहासाठी नाही तर अखिल विश्वासाठी दिला आहे. अशा महामानवाचे शिक्षण ज्या हायस्कूलमध्ये झाले, त्या शाळेत आपल्याला आज विचारमंथन करता येते आहे, हा एका अर्थाने डॉ. आंबेडकरांच्या क्रांतीचा विजय आहे, असे गडपायले म्हणाले.
डॉ. भारत पाटणकर म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साताऱ्यातील शाळा कालखंडातील सामाजिक स्थितीचा अभ्यास व त्यावर संशोधन झाले पाहिजे. डॉ. आंबेडकरांनी या देशाला जे संविधान दिले आहे, ते जगातील सर्व देशांतील राज्यघटनांपेक्षा कितीतरी पटीने सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे डॉ. आंबेडकरांच्या इथल्या शाळेतून नेमकी त्यांना कशी ऊर्जा मिळाली, हेही आपण शोधून काढले पाहिजे, असेही डॉ. पाटणकर म्हणाले.
अरुण जावळे म्हणाले, ‘महाराष्ट्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतून हा दिवस शाळा प्रवेश दिन म्हणून साजरा व्हावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. गणेश भिसे यांनी आभार मानले. मुंबई, पुणे, अमरावतीसह अनेक भागांतील लोक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शाळा, महाविद्यालयांतही उदंड प्रतिसाद
जिल्हा परिषद शिक्षण विभागाने केलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यायांमध्येही डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.