भाजपला डोस, तर स्थानिक नेत्यांनाही ठणकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:33 IST2021-01-09T04:33:18+5:302021-01-09T04:33:18+5:30

सातारा : ‘माझं मंत्रिमंडळ मी स्वत: निवडतो. मला कोणी मंत्री करू शकत नाही. माझं मंत्रिमंडळ माझे मित्र आहेत. तेच ...

Dose to BJP, but also to local leaders | भाजपला डोस, तर स्थानिक नेत्यांनाही ठणकावले

भाजपला डोस, तर स्थानिक नेत्यांनाही ठणकावले

सातारा : ‘माझं मंत्रिमंडळ मी स्वत: निवडतो. मला कोणी मंत्री करू शकत नाही. माझं मंत्रिमंडळ माझे मित्र आहेत. तेच आमचे कॅबिनेट मंत्रिपद आहे,’ असे म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपला मंत्रिमंडळ विस्ताराआधीच डोस दिला, तर लोकांनी निवडून दिल्यानंतर त्यांचे ऋण फेडण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची असते. ती त्यांनी पार पाडावी, असे इतर पक्षातील नेत्यांनाही त्यांनी ठणकावले.

उदयनराजेंनी शुक्रवारी सर्वांना धक्का देत सातारा शहरातील ग्रेड सेपरेटरच्या पाहणीचे निमित्त करुन थेट उद‌्घाटनच करून टाकले. त्यानंतर जलमंदिर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी ग्रामपंचायतीपासून केंद्रीय पातळीवरील नेत्यांपर्यंत सर्वांचाच समाचार घेतला.

उदयनराजे म्हणाले, ‘मी आत्तापर्यंतच्या आयुष्यात डोक्यातून नाही, तर मनातून विचार केला. माझ्या मनाला पटते, ते मी करतो. कोरोनाची पार्श्वभूमी पाहता, लोकांची संपूर्ण वाताहात झाली. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझ्या मनात विचार आला की जो काय निधी निवडणुकीवर खर्च होणार आहे, तो तिथे खर्च होण्यापेक्षा गरजू आणि उपेक्षितांच्या औषधोपचाराठी निधी मिळाला, तर ते सोन्याहून पिवळे होईल. मी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्याचे आवाहन केले, त्याला तसा प्रतिसादही मिळाला. त्यांचे मी मनापासून आभार मानतो.’

दरम्यान, ज्या ग्रामपंचायतींची निवडणूक लागली, त्या ठिकाणी स्थानिक नेत्यांचा हट्ट नडला. याबाबत बोलताना उदयनराजे म्हणाले की, ग्रामपंचायतीत राजकारण करत बसण्यापेक्षा समाजाचे ऋण कुठेतरी फेडले पाहिजे, हा विचार काही लोकांच्या मनात येत नाही. मी आयुष्यात कधी राजकारण केले नाही, तर समाजकारण केले. ज्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या त्यामुळे मला बरं वाटलं. बिनविरोधच्या निर्णयाचे अनुकरण संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात व्हायला पाहिजे होते. लोकप्रतिनिधींनी याबाबत विचार केला पाहिजे. राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहिलं, तर लोक महत्त्वाचे, समाज महत्त्वाचा आहे. जे लोक आपल्याला मतदान करतात, त्यांच्या जिवावर आपण सत्ता काबीज करतो, त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. लोकशाही असल्याने मी कोणाला जबरदस्ती करणार नाही. नेत्यांनी आत्मचिंतन केलं, तर खूप निधी जो वाया जाणार आहे, तो वाचेल. प्रत्येक ग्रामपंचायतीला निधी उपलब्ध करुन देणे हे माझे कर्तव्य समजतो.’

औरंगाबादचे संभाजीनगर व्हावे

औरंगाबादचे नामकरण बदलण्याच्या विषयावर सविस्तर विचार केला पाहिजे. यातून कसलाही उद्रेक होऊ नये. कोणाची मानहानी होऊ नये. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे पूर्वज होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा तर ते केवळ महाराज म्हणून त्यांच्याकडे लोकांनी पाहिले नाही. अनेक ठिकाणी आपण पाहतो, बॉम्बेचे मुंबई झाले, मग लोकशाहीत लोक निर्णय घेतील, असे स्पष्टीकरणही उदयनराजेंनी केले.

Web Title: Dose to BJP, but also to local leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.