डबेवाडीत आता डॉल्बी न्हाय वाजणार
By Admin | Updated: June 19, 2014 00:46 IST2014-06-19T00:44:17+5:302014-06-19T00:46:19+5:30
ग्रामसभेत निर्णय : डॉल्बीमुक्त गाव झाल्यानंतर फटाके वाजवून जल्लोष

डबेवाडीत आता डॉल्बी न्हाय वाजणार
परळी : वरातीत नाचण्यावरून बुधवारी (दि. ११) विकास पवार यांचा किरकोळ कारणावरुन खून झाला होता. परंतु त्यानंतर गावात पुन्हा डॉल्बी वाजलीच न्हाय पाहिजे, यासाठी गावामध्ये ग्रामसभा घेऊन डॉल्बीमुक्त गाव करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाने ग्रामस्थ खूष झाले आणि त्यांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.
गावात कोणताही आनंदाचा क्षण असल्यास त्या घरातील लोक डॉल्बी लावून आनंद व्यक्त करतात. कोणाच्या लग्नाची वरात असेल तर वरातीत डॉल्बी असतेच. वरातीत नाचणारे हौसे-नवसे पहिल्यांदा डॉल्बी आहे का, याची विचारणा करतात. मद्य पिऊन वरातीत नाचणे, हे तर आता नेहमीचेच झाले आहे. शेजारील गावात वरात असली तर काही हौशी मुले तिथे नाचायला जातात. असाच प्रकार बुधवार (दि.११) रोजी रात्री ११च्या सुमारास डबेवाडी येथील वरातीमध्ये घडला. बोगदा परिसरातील मंगळवार पेठेतील ट्रॅक्टरचालक विकास पवार (वय २६) यांचा ‘नाचायला चल की,’ या कारणावरुन मित्रांमध्ये झालेल्या वादात त्यांचा बळी गेला. त्यानंतर बोगदा आणि डबेवाडी या दोन्ही गटांमध्ये जोरदार वातावरण तापले. खून केला कुणी, का केला, कसा झाला याची काही कल्पना नसणाऱ्या डबेवाडी ग्रामस्थांना या प्रकरणाचा त्रास होऊ लागला. पाच दिवस संपूर्ण गाव दहशतीखाली राहिले आणि काहीही संबंध नसलेल्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.
अखेर सोमवार (दि. १६) रोजी गावकऱ्यांनी ग्रामसभा बोलावली. त्या सभेला अध्यक्ष म्हणून सातारा तालुका पोलीस निरीक्षक विष्णू पवार यांना बोलविण्यात आले.
गावकऱ्यांना आपली गाऱ्हाणी सुरू केली. त्यानंतर गाव एका ठाम निर्णयावर पोहोचले. आजपासून गावात डॉल्बी न्हाय वाजली पाहिजे, असा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. कोणी गावात डॉल्बी आणेल, त्याला पाच हजार एक रुपये दंड आणि संबंधितांची डॉल्बीसह पोलीस ठाण्यात रवानगी, असा ठाम निर्णय घेण्यात आला. या सभेस संपूर्ण डबेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते. या निर्णयानंतर ग्रामस्थ खूष झाले. त्यांनी फटाके लावून आनंद व्यक्त केला. (वार्ताहर)