वेळ सांगून येत नाही, सावधगिरीच सूचना देते!
By Admin | Updated: March 4, 2016 00:57 IST2016-03-03T22:54:20+5:302016-03-04T00:57:21+5:30
स्टिव्हन अल्वारीस : पश्चिम महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या कामाला वाव; संगणकीय प्रणालीमुळे ‘परिवहन’मध्ये पारदर्शकता

वेळ सांगून येत नाही, सावधगिरीच सूचना देते!
पद मिळालं तरी शिक्षण महत्त्वाचं, ही वडिलांची शिकवण
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्टिव्हन अल्वारीस यांना शिक्षणाचा पहिला पाठ घरातच मिळाला. वडील थॉमस अल्वारीस हे पेशाने शिक्षक़ ‘आयुष्यात शिक्षण महत्त्वाचं’ ही त्यांची शिकवण. त्यामुळे स्टिव्हन यांच्यासह त्यांचे दोन भाऊ व बहीणही उच्चशिक्षित आहे. स्टिव्हन यांनी सेवेत असतानाच ‘एलएलबी’ पदवी तसेच डॉक्टरेटसुद्धा मिळविली आहे. चंद्रपूरला असताना २००८-०९ मध्ये उल्लेखनीय कामासाठी राज्य शासनाकडून त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच लोकमान्य पुरस्कार, श्रीरामपूरला प्रकाश किरण प्रतिष्ठानचा समाजभूषण पुरस्कार व कऱ्हाडला समाजसेवा पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
संजय पाटील ल्ल कऱ्हाड
‘स्टिअरिंग’ माझ्या हाती आहे आणि मी सुरक्षित वाहन चालवतोय. मला कोणताच धोका नाही, हा प्रत्येक चालकाचा आत्मविश्वास; पण तुम्ही सुरक्षित असला तरी समोरून येणारा नियंत्रणात असेलच असे नाही. त्यामुळे सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम पाळायलाच पाहिजेत. कोणतीही वेळ सांगून येत नाही.’ कऱ्हाडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्टिव्हन अल्वारीस यांचं हे मत.
स्टिव्हन अल्वारीस यांनी जून २०१४ मध्ये कऱ्हाडच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा पद्भार स्वीकारला. त्यापूर्वी त्यांनी औरंगाबाद, लातूर, नांदेड, चंद्रपूर, श्रीरामपूर येथील परिवहन कार्यालयात सेवा बजावली आहे. कऱ्हाडच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा पद्भार स्वीकारल्यापासून त्यांनी कार्यालयीन कामात पारदर्शकता आणि सुरक्षित वाहतूक या दोन गोष्टींवर भर दिला.
‘बदल हा निसर्गाचा नियम. यापुढील काळात प्रशासकीय कामामध्ये मोठ्या प्रमाणात संगणकीय प्रणालीच वापरली जाणार आहे. कऱ्हाड, पाटण हा भाग ग्रामीण असला तरी या भागाने बदल लवकर स्वीकारलेत.
परिवहन कार्यालयातील ही प्रणालीही आता सामान्यांच्या सवयीची झाली आहे,’ स्टिव्हन अल्वारीस सांगत होते. ‘रस्ता सुरक्षा हे परिवहन विभागाचे मुख्य कार्य आहे. त्यासाठी कऱ्हाडचे उपप्रादेशिक कार्यालय विविध उपाययोजना आखत आहे. रस्तासुरक्षा कक्षासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. वास्तविक, वाहनचालक व प्रवाशांची सुरक्षा त्यांच्याच हातात आहे.
दुचाकीसाठी हेल्मेट व चारचाकीसाठी सीटबेल्ट बंधनकारक करण्यात आले आहेत. हे नियम त्रासिक वाटत असले तरी जाचक अजिबात नाहीत. या नियमांचे पालन केल्यास दुर्घटनेत स्वत:ची सुरक्षितता होते, हे प्रवासी व चालकांनी समजून घ्यायला हवे.’
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज हे स्टिव्हन अल्वारीस यांचे मूळगाव. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण निपाणीतील पालिका शाळेत झाले. त्यानंतर पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी बीई (मेकॅनिकल) ही पदवी घेतली. त्याचबरोबर ‘डीसीएम’चा अभ्यासक्रमही पूर्ण केला. ‘एमबीए’, ‘एलएलबी’ या पदव्यांबरोबरच त्यांनी ‘पीएच.डी’ही मिळविली आहे. राज्यसेवा परीक्षा देण्यापूर्वी त्यांनी काही ठिकाणी खासगी नोकरीही
केली आहे. १९९५ मध्ये त्यांची विक्रीकर निरीक्षकपदी नियुक्ती झालेली. मात्र, तरीही त्यांनी १९९६ मध्ये ‘एमपीएससी’ची परीक्षा दिली. त्यामध्ये त्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले.
पात्रतेच्या जोरावर त्यावेळी त्यांना कोणतेही पद मिळत होते. मात्र, शिक्षणाचा विचार करून त्यांनी परिवहन विभागाची निवड केली. एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर
१९९८ मध्ये ते परिवहनमध्ये रुजू झाले. १९९९ मध्ये औरंगाबादला त्यांची पहिली नेमणूक झाली होती.