लखन नाळेवाठार निंबाळकर :‘पंढरीशी जावे ऐसे माझे मनी, विठाई जननी भेटे केव्हा...’ या उक्तीप्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातील चौथ्या मुक्कामासाठी रविवारी बरड गावी विसावला. वैष्णवांचा मेळा सोमवारी सातारा जिल्ह्याचा निरोप घेऊन सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.सोहळा वाटेवर धुळदेव, कोळकी, झिरपवाडी, सांगवी, अलगुडेवाडी गावातील ग्रामपंचायत तसेच सोसायटीचे पदाधिकारी विविध मान्यवर ग्रामस्थांनी सोहळ्याचे स्वागत करून पालखीचे दर्शन घेतले. पालखी सोहळा सकाळच्या न्याहरीसाठी विडणी येथे विसावला. या ठिकाणी परिसरातील विविध गावांतील भाविकांनी दर्शन घेतले. काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर विडणीतून पालखी सोहळा मार्गस्थ झाला.पालखी मार्गावर वडले, दुधेबावी, माझेरी, सोनवडी खुर्द, सोनवडी बुद्रुक, तिरकवाडी आदी गावांतील ग्रामस्थांनी माउलींच्या पालखीचे दर्शन घेतले. दुपारच्या जेवणासाठी पिंप्रद येथे विसावला. वाजेगाव येथे काही काळ विसावा घेऊन मार्गस्थ होऊन तालुक्यातील व जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामासाठी बरड येथे विसावला. बरडच्या वेशीवर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पंचायत समितीचे सदस्य, विविध सहकारी व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, विविध राजकीय पदाधिकारी, श्रीराम कारखान्याच्या संचालकांनी स्वागत केले.लाखो भाविकांचा हा सोहळा सोमवारी सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. जिल्ह्यातील प्रशासनाच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्ह्याच्या सीमेवर राजुरी गावच्या सीमेवर माउलीच्या पालखी सोहळ्याला निरोप देण्याचा तसेच सोलापूर जिल्ह्याच्या वतीने स्वागताचा समारंभ होणार आहे.फलटण तालुका प्रशासनात उपविभागीय अधिकारी प्रियांका अंबेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, तहसीलदार अभिजित जाधव, गटविकास अधिकारी सतीश कुंभार, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, उपअभियंता राजकुमार मठपती, शाखा अभियंता सोपान बिराजदार, ग्रामीण पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, तालुका वैद्यकीय अधिकारी निखिल दिघे यांनी वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी प्रशासकीय यंत्रणा राबविली.
उत्साहाला उधाण..पालखी सोहळ्यासाठी वीर धरणातून नीरा उजवा कालव्यामध्ये मुबलक पाणी उपलब्ध करून भाविकांसाठी अंघोळ व कपडे धुण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात आले होते. महिलांनी घरासमोर सडा, रांगोळ्या काढून वारीत आलेल्या वारकऱ्यांना मोफत खाद्यपदार्थ तसेच जेवणाची व्यवस्था केली होती. गावातील अनेक दानशूर व्यक्तींनी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी आपापल्या परीने भोजनाची सोय उपलब्ध केली होती.