तेराजणांना मिळाला लाल दिवा; अनेकांनी राखले आपले गड कायम
By Admin | Updated: September 16, 2014 23:27 IST2014-09-16T22:31:33+5:302014-09-16T23:27:09+5:30
सातारा जिल्ह्यात झाले साठ आमदार ‘लोकनियुक्त’

तेराजणांना मिळाला लाल दिवा; अनेकांनी राखले आपले गड कायम
मोहन मस्कर-पाटील - सातारा -१९५२ ते २00९ या काळात महाराष्ट्रात तेरा विधानसभा निवडणुका झाल्या. यामध्ये महाराष्ट्र राज्य स्वतंत्र होण्यापूर्वीचा काही काळ आहे. या ५७ वर्षांच्या कालावधीत सातारा जिल्ह्यात आजअखेर साठजणांना आमदार तर तेराजणांना मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. यापैकी काहीजण सात, पाच, चार, तीन, दोनवेळा आमदार म्हणून कार्यरत राहिले आहेत. १९५२, १९५७ मध्ये जिल्ह्यात अकरा आमदार होते. त्यावेळी सातारा पूर्व, सातारा ग्रामीण, फलटण-माण, माण ग्रामीण, जावळी, खटाव, वाई-खंडाळा, पाटण कऱ्हाड दक्षिण, कऱ्हाड उत्तर असे मतदारसंघ होते. १९६२ मध्ये एक मतदारसंघ कमी झाल्याने दहा मतदारसंघ झाले. २00४ पर्यंत हेच कायम होते. २00९ च्या निवडणूका मतदारसंघ पुनर्रचनेनुसार झाल्या आणि फक्त आठच मतदारसंघ राहिले.केवळ सातारा नव्हे तर राज्याच्या राजकारणात यशवंतराव चव्हाण, किसन वीर, लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी आपला दबदबा कायम ठेवला.
मात्र, यशवंतराव चव्हाणच सर्वात प्रभावी राहिले. १९५२ पासून हयात असेपर्यंत यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई मंत्री होते. त्यापाठोपाठ मालोजीराजे नाईक-निंबाळकर, यशवंतराव मोहिते, प्रतापराव भोसले, अभयसिंहराजे भोसले, विलासराव पाटील-उंडाळकर, मदनराव पिसाळ, श्याम अष्टेकर, भाऊसाहेब गुदगे, विक्रमसिंह पाटणकर, रामराजे नाईक-निंबाळकर आणि आता शशिकांत शिंदे यांना मंत्री होता आले.
यशवंतराव मोहिते, चिमणराव कदम, दादासाहेब जगताप, केशवराव पाटील, मदनराव पिसाळ, भाऊसाहेब गुदगे, विष्णू सोनावणे, रामराजे नाईक-निंबाळकर, शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील तीन तर कॉ. व्ही. एन. पाटील, प्रभावती सोनावणे, कृष्णचंद्र भोईटे, पी. डी. पाटील हे दोनवेळा आमदार झाले.