दिवाळीला भेट भेसळयुक्त पदार्थांची!
By Admin | Updated: November 2, 2015 23:56 IST2015-11-02T21:17:24+5:302015-11-02T23:56:40+5:30
प्रशासन सुस्त : मसूर परिसरात खाद्यपदार्थ, तेलात भेसळ होत असल्याचा ग्राहकांचा आरोप

दिवाळीला भेट भेसळयुक्त पदार्थांची!
मल्हारपेठ : किराणा मालाचे दुकान, हॉटेल, ढाब्यांवर खाद्यपदार्थ, खाद्यतेलांच्या तसेच बेकरी व्यवसाय करणाऱ्या सर्वच दुकानांमध्ये भेसळयुक्त पदार्थांची सर्रास विक्री होत असताना अन्न भेसळ, औषध प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे.
ऐन दिवाळी सणाच्या दिवसात तरी या सर्व भेसळीला लगाम लागणार का? अगोदरच या सर्व बाबीकडे प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष आहे. निव्वळ कागदी आणि जुजबी कारवाई करून अन्न व भेसळ प्रशासन गप्प आहे.
पाटण तालुक्यात उत्पादित होणाऱ्या सर्व पदार्थांसह सर्व तेलयुक्त पदार्थांची विक्री होत असते. भेसळयुक्त पदार्थांच्या विक्रीस शासनाने प्रतिबंध केला असला तरी याची कोणतीच भीती व्यावसायिकांना नसल्याचे जाणवत आहेत.
हॉटेल व्यावसायिक, ढाबे, किराणा दुकानदार, वडापावचे गाडे, खाद्य तेलाची दुकाने, बेकरी व्यावसायिक तसेच इतर छोट्या-मोठ्या व्यावसायिकांच्याकडे या आशयांचे परवाने असणे कायद्याने बंधनकारक आहे. तसे परवानेदेखील व्यावसायिकांकडे दर्शनी भागात लटकवलेले दिसतात.
हे केवळ लोकांची दिशाभूल करण्यासाठीच आहेत. सामन्य ग्राहक या बाबींकडे गांभीर्याने कधीच पाहत नाहीत. त्यामुळे या व्यावसायिकांचे फावते, असा आरोप केला जात आहे.
सर्वच पदार्थांमध्ये भेसळीचे प्रमाण एवढं प्रचंड आहे की, त्याचे नमुने जर तपासाला पाठवावे म्हटले तर प्रत्येक पदार्थांची बेरीज केली तर तपासणी करण्यास प्रशासनाला सुद्धा या गोष्टी शक्य नाहीत. तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व दुकाने, हॉटेल, ढाबे, खाद्यतेलांची दुकाने, बेकरीवाले तसेच किराणा मालांची दुकाने यांच्यावर करडी नजर ठेवण्यास प्रशासनच विसरले आहे.
मोहीम गतिमान करताना दिसत नाहीत. निव्वळ बाजारपेठाच्या ठिकाणी कारवाहीसाठी न येता फक्त भीती दाखविण्यासाठी येतात. भेसळयुक्त पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणामाचे काय? याचा मात्र शासनाला विसर पडलाय. यावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी अन्न भेसळ प्रशासनाची असताना शासन मात्र उदासीन का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्ह्याच्या भेसळ प्रशासनाने प्रत्येक तालुक्यात सणासुदीत तरी ही मोहीम गतिमान करण्याची मागणी होत आहे. परराज्यातून येणाऱ्या उपपदार्थांची तपासणी करणे गरजेचे आहे. शासनाने सर्व पदार्थांच्या पॅकिंगवर पदार्थ सदोष असल्याचा शिक्का लावणे बंधनकारक केले असले तरी ही प्रक्रिया मात्र निव्वळ फार्सच आहे, अशी भावना ग्राहकांची निर्माण झाली आहे. (वार्ताहर)
दिवाळीच्या सणाला मोठ्या प्रमाणावर तळण केले जाते. फराळाचा वापर केला जातो. कमी दरात मिळणारी वस्तू भेसळयुक्त असतात. बेसनपीठ, तेल यामध्ये भेसळ झालेली पाहायला मिळते. यासाठी महिलांनीच वस्तू खरेदी करताना खात्री करणे गरजेचे आहे. तरच कुटुंबाचे आरोग्य चांगले राहील.
- चारुशीला कवर,
मूळगाव, ता. पाटण
स्वस्तात मिळतात म्हणून भेसळयुक्त खाद्यपदार्थांचा आहारात वापर झाला तर आरोग्यावर परिणाम होता. रासायनिक मिश्रित भेसळयुक्त पदार्थांचा आरोग्यावर दुष्परिणाम हळूहळू जाणवू लागतो. अनेकदा शाकाहारी असल्याचे भासवून मांसाहाराचा वापर होतो. पचनसंस्थेवर याचे परिणाम होतो.
- डॉ. विजय देसाई,
नवा रस्ता