निवकणे धरणग्रस्तांचे भिजत घोंगडे...
By Admin | Updated: November 25, 2015 23:56 IST2015-11-25T23:56:27+5:302015-11-25T23:56:27+5:30
शेतकरी भूमिहीन : लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

निवकणे धरणग्रस्तांचे भिजत घोंगडे...
मणदुरे : निवकणे लघू पाटबंधारे प्रकल्पाचे काम गेल्या पंधरा वर्षांपासून अजूनही अपुरेच आहे. धरणाचे कामही रेंगाळलेले आहे. नवीन वाढीव भूमिसंपादनात ६५ टक्के रक्कम भरून पुनर्वसनास पात्र करावे, अशी मागणी धरणग्रस्तांनी केली आहे. दरम्यान, याकडे लोकप्रतिनिधी, अधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे.
निवकणे लघू पाटबंधारे प्रकल्पाची कामे १९९९ मध्ये सुरू करण्यात आली. याबरोबरच मणदुरे विभागात साखरी-चिरेघर, बिबी प्रकल्पाची कामे हाती घेण्यात आली. यापैकी साखरी-चिरेघर धरणग्रस्तांच्या शासकीय निधीचे वाटप करून या प्रकल्पात पाणी अडविण्यात आले आहे. तर बिबी धरणग्रस्तांचे देणी भागविली असून, धरणाचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र निवकणे प्र्रकल्पग्रस्तांची शासकीय अधिकाऱ्यांकडून नेहमीच प्रकल्प बाधितांची शासकीय अधिकाऱ्यांकडून नेहमीच अडवणूक केली जात आहे. निवकणे प्रकल्प हा उंचीवर असल्याने विभागात गरुत्त्वाकर्षणाने पाणी देण्यासाठी योग्य असल्याने उंची वाढविण्यात आली आहे. या धरणाचे भूमिसंपादन दोन वेळा झाले आहे. पहिल्या भूमिसंपादनाची देणी भागविण्यात आली असली तरी दुसऱ्या भूमिसंपादनातून ६५ टक्के रक्कम कूपन घेऊन शासनाने पुनर्वसनास पात्र करावे, अशी मागणी निवकणे येथील शेतकरी करीत आहेत, तर पहिल्या भूमिसंपादनात ६५ टक्के रक्कम भरलेल्या शेतकऱ्यांना अजूनही पर्यायी जमिनी मिळाल्या नाहीत. धरणाच्या भिंतीसाठी शेतकऱ्यांनी २००१ मध्ये उत्खनन केले आहे. त्यावेळेपासूनचे तळी, बांध, झाडे, पाईपलाईन, शेड यांच्या रक्कमेचे व्याज मिळावे. पुनर्वसनासाठी ६५ टक्के रकमा भरून घेऊन पर्यायी जमिनी द्याव्यात. ६५ टक्के रक्कम ज्या शेतकऱ्यांनी भरली त्या शेतकऱ्यांना या रकमेवरील व्याज द्यावे अशा मागण्या केल्या आहेत.
तीन पिकांवरील शेती एका पिकांवर २००१ पासून धरणाच्या भिंतीचे काम सुरू असल्याने पूर्वी आडव्या पाटाच्या पाण्यावर तीन पिके घेण्यात येत होती. तर धरणाच्या भिंतीखालील क्षेत्रात आता केवळ एका पिकावर, पावसावर समाधान मानावे लागत असते. भिंतीमुळे आडवा पाटच बंद झाला असल्यामुळे तीन पिकांवरील शेती एका पिकावर आली आहे. उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या कारणाने केरा नदीपात्रातील पाणी पिकांसाठी देता येत नाही. यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे.
निवकणे येथील शेतकऱ्यांचे नवीन भूमिसंपादनावेळी ६५ टक्के रक्कम भरून घेऊन शासनाने पुनर्वसनासाठी पात्र करावे. भूमिसंपादनाचा निधी तातडीने द्यावा.
- सूर्यकांत गुरव,
उपसरपंच, निवकणे
धरणाची माहिती...
धरणाचा पाणीसाठा १.९ टीएमसी
धरणाची किंमत १६५ कोटी
बाधित क्षेत्र ५० हेक्टर
लाभक्षेत्र १००० हेक्टर