धोम ३२, तर बलकवडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:25 AM2021-06-21T04:25:47+5:302021-06-21T04:25:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाई : वाई तालुक्याला वरदान ठरणाऱ्या धोम, बलकवडी पाणलोट क्षेत्रांत गेल्या आठ दिवसांपासून संततधार सुरू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाई : वाई तालुक्याला वरदान ठरणाऱ्या धोम, बलकवडी पाणलोट क्षेत्रांत गेल्या आठ दिवसांपासून संततधार सुरू आहे. या पावसामुळे दोन्ही धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. धोम धरणात ३२, तर बलकवडी धरणात २६ टक्के पाणीसाठा झाला आहे.
सातारा जिल्ह्यात यंदा जूनच्या मध्यावर मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला. शनिवारी व रविवारी पावसाने काहीशी उघडीप दिली असली तरी गेल्या आठ दिवसांत धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह सर्वत्र पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. वाईच्या पश्चिम भागात भाताचे तरवे टाकले असून बहुतांश खरीप हंगामाच्या पेरण्या झाल्या आहेत. पश्चिम भागात पडत असलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
दरम्यान, वाई तालुक्याला वरदान ठरणाऱ्या धोम व बलकवडी धरणाऱ्या पाणीसाठ्यातही हळूहळू वा होऊ लागली आहे. पाचगणी, महाबळेश्वरमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे डोंगरदऱ्यांतून वाहत येणारे पाणी मोठ्या प्रमाणात दोन्ही धरणांत येत आहे. त्यामुळे दोन्ही धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, धोम धरणात ३२ तर बलकवडी धरणात २६ टक्के पाणीसाठा झाला आहे. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असून, कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
फोटो : २० धोम डॅम
गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धोम धरणाच्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. (छाया : पांडुरंग भिलारे)