खुनातील पळालेला संशयित जाळ्यात!
By Admin | Updated: August 13, 2015 22:57 IST2015-08-13T22:57:25+5:302015-08-13T22:57:25+5:30
अक्षय पवारला अटक : तालुका पोलिसांची ‘फिल्डिंग’ यशस्वी

खुनातील पळालेला संशयित जाळ्यात!
सातारा : सुमारे पाच महिन्यांपूर्वी घडलेल्या खून प्रकरणातील मुख्य संशयिताला बेड्या ठोकण्यात तालुका पोलिसांना गुरुवारी सकाळी यश आले. २५ दिवसांपूर्वी तो स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती सापडला होता; मात्र वैद्यकीय तपासणीसाठी नेल्यानंतर पोलिसांना हिसडा देऊन पलायन केले होते. गुरुवारी सकाळी रहिमतपूरमधून त्याला ताब्यात घेण्यात आले.
आरळे (ता. सातारा) येथील बजरंग जगन्नाथ गायकवाड (वय ३१) यांचे जमिनीच्या व्यवहारातील रकमेवरून दि. २६ मार्च रोजी अपहरण झाले होते. दुसऱ्या दिवशी त्यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणातील प्रमुख संशयित अक्षय लालासाहेब पवार (वय २०, रा. खंडोबाचा माळ, पंताचा गोट, रविवार पेठ, सातारा) हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. गायकवाड यांना अंभेरी घाटात नेऊन मारहाण करण्यात आली होती आणि त्या रात्री सातारा येथील एका खोलीत कोंडून ठेवले होते. सकाळी ते मृतावस्थेत आढळून आल्यानंतर त्यांचा मृतदेह संशयितांनी अंभेरी घाटात नेऊन जाळल्याचे समोर आले होते. याप्रकरणी पोलिसांनी वासुदेव शिवाजी जांभळे (वय २२, रा. रहिमतपूर), आकाश शरद सोनटक्के (२८, रा. बारावकरनगर, सातारा), राजेंद्र ऊर्फ वैभव रामराव पवार (४५, रा. खेड, ता. सातारा) या तिघांना तालुका पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर संदीप रावसाहेब भोसले (वय २८, रा. अग्रम धुळगाव, ता. कवठे महांकाळ, जि. सांगली) याला अटक झाली. त्यांच्या चौकशीतून अक्षय पवार या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले होते. तीन महिन्यांहून अधिक काळ पोलिसांना गुंगारा दिल्यानंतर शनिवारी (दि. १८ जुलै) गुन्हे शाखेच्या पथकाने अक्षयला डोळेगाव (ता. कोरेगाव) येथील एका पोल्ट्री फार्ममधून ताब्यात घेतले होते. मात्र, वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेले असता, त्याने तेथून पलायन केले होते.
रात्रभर पोलीस अक्षयचा पाठलाग करीत होते. मात्र, शहराबाहेर पळण्यात तो यशस्वी झाला होता. (प्रतिनिधी)
(संबंधित बातमी पान ५)