माणच्या ‘देशमुखी’चे रण धगधगतेच!
By Admin | Updated: November 28, 2015 00:21 IST2015-11-27T22:51:38+5:302015-11-28T00:21:58+5:30
निमित्त बंधाऱ्यांचे : सरकार बदलले तरी आमदारांचा राग कायम; भ्रष्टाचार खरंच बाहेर येणार ?

माणच्या ‘देशमुखी’चे रण धगधगतेच!
सातारा : मागील विधानसभा निवडणुकीआधी आमदार जयकुमार गोरे यांना मोठा संघर्ष करावा लागला. राष्ट्रवादीची मोठी फौज गोरेंना घरी धाडण्यासाठी सज्ज होती. माण-खटावची ‘देशमुखी’ आपल्याकडे घेण्यासाठी राष्ट्रवादीने अनेक
खेळ्या केल्या होत्या. तेच रण अजूनही धगधगत आहे. आमदार जयकुमार गोरे यांनी सरकार बदलले असले तरी तो राग मनात कायम ठेवलाय. ‘माण आणि खटाव तालुक्यांत शासनाच्या स्थानिकस्तर विभागाकडून जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या ७० पैकी ३८ हून अधिक बंधाऱ्यांचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी न करता काहीच उपयोग नसणाऱ्या साईटस् निवडल्याने कोट्यवधींचा निधी पाण्यात गेला आहे. संबंधित विभागाच्या सचिवांनी श्रेयवादाच्या अट्टाहासातून माण-खटावमधील जलयुक्त शिवारची सूत्रे हाती घेतली आहेत. अधिकारी उघडपणे सचिवालय ते मंत्रालयापर्यंत कमिशनराज सुरू आहे. आमचे काही होत नाही, असे सांगत आहेत,’ असा हल्लाबोल आमदार जयकुमार गोरे यांनी केला आहे. विशेष म्हणजे, संबंधित विभागाचे सचिव कोण, हे साऱ्या जगाला माहीत आहे. हा मुद्दा उपस्थित करून आमदारांनी जलयुक्त शिवारमधून झालेल्या कामांचा पंचनामा सुरू केला आहे, हे आता स्पष्ट होत आहे. आमदारांच्या या आरोपांमुळे कामांच्या गुणवत्तेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे. बंधाऱ्यांत पाणी शिल्लकच राहत नसेल तर हा पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. जर गळत्या आहेत तर ज्या ठेकेदारांनी ही कामे केली आहेत, त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे ठरणार आहे. या ठेकेदारांकडून या गळत्या काढून घ्याव्या लागतील.प्रशासनानेही संबंधित ठेकेदारांच्या बाबतीत काय कारवाई केली आहे?, हे पुढे येणे गरजेचे आहे. ही कारवाई झाली नसेल तर यात फार मोठा भ्रष्टाचार झालाय, हे म्हणायला वाव आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणे, गरजेची असल्याची मागणी होत आहे. दरम्यान, मागील निवडणुकीत आमदार गोरे यांच्याविरोधात राष्ट्रवादीतर्फे तत्कालीन विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांना विधानसभेचे तिकीट मिळणार असल्याची जोरदार चर्चा होती. गोरेंना शह देण्यासाठी राष्ट्रवादीने मोठ्या हालचाली केल्या होत्या. भ्रष्टाचाराच्या या मुद्द्यावरून आमदार गोरे यांनी पुन्हा राष्ट्रवादीवर शरसंधान साधले आहे. दोन्ही काँगे्रसमधील असणारा संघर्षाचा मुद्दा पुढे आला आहे. (प्रतिनिधी)
दोघे असतील भविष्यातील प्रतिस्पर्धी ?
मागील विधानसभा निवडणुकीमध्ये माण-खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार जयकुमार गोरे यांना कोण शह देणार? याची गणिते मांडली जात होती; तेव्हा प्रशासनात उच्चपदस्थ असणारे अधिकारी लोधवडेचे प्रभाकर देशमुख यांचे नाव अग्रक्रमावर होते. जयकुमार विरुध्द देशमुख असा सामना रंगवण्याच्या हालचाली झाल्या होत्या. देशमुखांचा मतदारसंघातील वाढता प्रभाव गोरेंसाठी डोकदुखी ठरु शकते, त्यामुळे भविष्यात गोरेंना देशमुख हेच प्रतिस्पर्धी असतील, असे भाकित राजकीय अभ्यासक व्यक्त करतात.