राजीव गांधी पंचायत सशक्तीकरणाचा बोजवारा
By Admin | Updated: August 27, 2014 23:34 IST2014-08-27T22:10:44+5:302014-08-27T23:34:45+5:30
संदीप शिंदे यांचा आरोप : कागदोपत्री रंगवली जाताहेत प्रशिक्षणे

राजीव गांधी पंचायत सशक्तीकरणाचा बोजवारा
सातारा : केंद्र व राज्य शासनाच्या निधीद्वारे यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या राजीव गांधी पंचायत समिती सशक्तीकरण अभियानांतर्गत ग्रामपंचायत सदस्यांसाठी राबवण्यात येत असलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा बोजवारा उडाला आहे.
संबंधित प्रशिक्षणे कागदोपत्री रंगवली जात असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य संदीप शिंदे यांनी केला असल्याने खळबळ उडाली आहे.या प्रशिक्षणाला ग्रामपंचायत सदस्य उपस्थितच राहत नसल्याने नेमके कोणाचे सशक्तीकरण सुरू हा संशोधनाचा विषय असून, हा प्रशिक्षण कार्यक्रम घाईगडबडीत कागदोपत्रीच रंगवला जात असल्याचा जिल्हा परिषद सदस्य संदीप शिंदे यांनी केला. यासंदर्भात त्यांनी वर्ये, ता. सातारा येथे सुरू असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाला भेट देऊन ‘स्टिंग आॅपरेशन’ केले असता हा गलथानपणा चव्हाट्यावर आला आहे. यावेळी दीपक मेणकर उपस्थित होते.
या सर्व प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी संदीप शिंदे यांनी यावेळी उपस्थितांसमोर बोलताना केली आहे. (प्रतिनिधी)
कागदावर १५०... प्रत्यक्ष मात्र ११०...!
भोजन, चहा, नाष्टा खर्चाबाबत प्रती सदस्य १५० रुपये खर्च करण्यात येत असल्याचे यादव यांनी सांगितले. त्याबाबत संबंधित भोजन, चहा, नाष्टा पुरवठादारास विचारले असता त्याने ११० रुपयांत आम्ही सर्व देतो, असे सांगितले. मग उरणारे पैसे कोणाच्या खिशात जातात, याबाबत साशंकता निर्माण होते. जर भोजन खर्चात असा भ्रष्टाचार असेल तर इतर बाबीतही असा भ्रष्टाचार केला जात असेल; मात्र यादव यांनी उरलेले पैसे शासनाकडे परत पाठवले जातात, असे सांगितले.
प्रशिक्षण कालावधीत ४० ग्रामपंचायत सदस्यांना प्रशिक्षण द्यायचे होते. त्यासाठी यशदाकडून प्रशिक्षणाचा भाग ‘अ’ साठी ५२ हजार ८०० रुपये व भाग ‘क’साठी १७ हजार ६०० रुपये निधी देण्यात येणार आहे. मात्र, घाईगडबडीत घेतलेल्या या प्रशिक्षणासाठी ग्रामपंचायत सदस्यच उपस्थित नव्हते. काही पहिल्या सत्रात येऊन सह्या करून निघून गेल्याचे निदर्शनास आले तर काही महिला सदस्यांचे पती या प्रशिक्षणास उपस्थित राहत असल्याचे निदर्शनास आले. या कार्यक्रमासाठी नियुक्त अधिकारी तसेच ग्रामसेवकही प्रशिक्षणास उपस्थित नव्हते.