घनतिमिरात दिसेना वाट... कुटुंब शोधतेय कवडसा!
By Admin | Updated: July 13, 2014 22:53 IST2014-07-13T22:47:33+5:302014-07-13T22:53:04+5:30
एकुलत्याला उभं करायचंय : खेळण्याच्या वयात ताप मेंदूत शिरला; आर्थिक मदतीची गरज

घनतिमिरात दिसेना वाट... कुटुंब शोधतेय कवडसा!
सातारा : ‘ए तू माझा मुलगा आहेस, असं रडायचं असतं होय..? चल मन खंबीर करायचं अन् हसत-हसत घरी जायचं. तुला काही होणार नाही’, बस्स एवढंच वाक्य बोलेपर्यंत मनीषा येवले या माउलीचा जीव कंठाशी येतो. खेळण्या-बागडण्याच्या वयात पोरगं अंथरुणाला खिळलेलं पाहून भरदुपारी अंधारून आल्यासारखी अवस्था होते तिच्या मनाची! अठराविश्व दारिद्र्यामुळं हा काळोख अधिक गडद होतो अन् दिसत नाही एकही कवडसा...
शेंदूरजणे, ता. कोरेगाव येथील येवले दाम्पत्य नोकरीच्या निमित्ताने वाढे येथे वास्तव्यास आले. गावाकडे जिरायत शेती. असून नसल्यासारखी. कुटुंबाची दोन वेळची सोय व्हावी म्हणून मुकुंद येवले यांनी वाहनचालकाची नोकरी पत्करली. नोकरी आणि शेती अशी दुहेरी कसरत करत मुलांच्या शिक्षणाचे पाहिले.
आकाशच्या शिक्षणात गरिबीचा व्यत्यय येऊ नये म्हणून तो त्याच्या मामाकडे मुंबईला राहत होता. त्याची छोटी बहीण आकांक्षा दहावीत कन्या शाळेत शिकतीये. आता उन्हाळ्याच्या सुटीत तो त्याच्या आजोळी म्हणजे फलटण तालुक्यातील घाडगेवाडी येथे आला होता. मोकळं मैदान, धम्माल करायला त्याच्याच वयाची मुलं... मग काय, रोज क्रिकेटचे डाव सुरू झाले. पण मुंबईच्या वातावरणात वाढलेल्या आकाशला हे मोकळेपण सोसलं नाही. तो आजारी पडला. किरकोळ थंडी-ताप असेल असं म्हणत त्याला स्थानिक औषधोपचार दिले गेले. परिणाम होईना, हे पाहून त्याला साताऱ्यात आणले. इथे डॉक्टरांनी धक्कादायक माहिती दिली. ताप मेंदूत शिरल्यामुळे त्याचे अर्धे शरीर अचेत झाल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला. हे ऐकल्यावर कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या उपचाराचा खर्चही लाखांच्या घरात सांगितला. मुलाच्या प्राणापेक्षा काहीच मोठं नाही असं म्हणत येवले यांनी उपचार करण्यास परवानगी दिली.
आकाश मे महिन्यापासून येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याचे बिल शनिवारपर्यंत सव्वाचार लाख रूपये होते. नातेवाइक आणि आप्तेष्टांनी त्याच्या कुटुंबीयांना पावणेदोन लाख रूपये दिले. अजून अडीच लाख रूपये देणे शिल्लक आहे. येवले यांच्याकडचे आर्थिक स्रोत संपले आहेत. वैद्यकीय उपचार पूर्ण झाले असून आता डॉक्टरांनी आकाशला घरी जाण्याचा सल्ला दिला आहे. बिल न भरल्यामुळे तो अद्याप दवाखान्यातच आहे. आता त्याला गरज आहे, ती समाजातील दानशूर लोकांनी आर्थिक पाठबळ देण्याची. (प्रतिनिधी)