‘रयत’मधील ‘लोकशाही’ प्रथमच वादात!
By Admin | Updated: May 9, 2014 00:05 IST2014-05-09T00:05:34+5:302014-05-09T00:05:34+5:30
सातारा : १९८९ पासून रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी असलेल्या शरद पवारांनी यंदा अर्जच भरू नये

‘रयत’मधील ‘लोकशाही’ प्रथमच वादात!
सातारा : १९८९ पासून रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी असलेल्या शरद पवारांनी यंदा अर्जच भरू नये, अशी मागणी करणारे पत्रक संस्थेच्या व्यवस्थापकीय समितीचे सदस्य प्रा. यू. जी. पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आणि आतापर्यंत कधीच पृष्ठभागावर न आलेली संस्थेच्या ‘लोकशाही’ची चर्चा आम झाली. संस्थेत हुकूमशाही असल्याचा आरोपही प्रथमच झाला आणि त्याला प्रत्युत्तर देण्याचे कर्तव्यही संस्थेला प्रथमच पार पाडावे लागले. प्रा. पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात पवारांनी संस्थेत हुकूमशाही आणल्याचा आरोप तर झालाच; शिवाय ‘आपली माणसे’ कार्यकारिणीवर नियुक्त केल्याचा मुद्दाही प्रथमच चर्चेत आणला. इतर शिक्षणसम्राटांच्या संस्थांप्रमाणेच ‘रयत’ची वाटचाल असल्याचा गंभीर आरोप केला गेला. या पत्रकानंतर संस्थेचे चेअरमन अॅड. रावसाहेब शिंदे, व्हाइस चेअरमन डॉ. अनिल पाटील, व्यवस्थापकीय समितीचे सदस्य पतंगराव कदम आणि शंकरराव कोल्हे यांनी हे आरोप व्यक्तिद्वेषातून केले गेल्याचे म्हटले आहे. संस्थेच्या अध्यक्षपदाची निवडणूक ९ मे रोजी होत असून, चेअरमनपदासाठी डॉ. अनिल पाटील आणि सचिवपदी पनवेल येथील प्राचार्य गणेश ठाकूर यांचे नाव निश्चित झाले आहे. ८ किंवा ९ मे रोजी पवार स्वत:च या नावांची घोषणा करणार असल्याचे प्रसिद्ध झाले, त्याच वेळी खुद्द पवारांना प्रथमच आव्हान दिले गेले. ‘रयत शिक्षण संस्था ही गेली ९५ वर्षे शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी अग्रगण्य संस्था असून, शरद पवार हे संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत. १९७२ पासून ते जनरल बॉडीचे सदस्य आणि व्यवस्थापन समितीचे सदस्य म्हणूनही कार्यरत होते. १९८९ पासून आजअखेर ते अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. १९५९ पासून जवळपास ६३ वर्षे प्रा. डॉ. एन. डी. पाटील हे संस्थेचे व्यवस्थापकीय समिती सदस्य, चेअरमन, जनरल बॉडी सदस्य अशा विविध पदांवर कार्यरत आहेत. गेली ९५ वर्षे संस्थेच्या पदाधिकारी निवडीसंदर्भात सर्वजण एकत्र येऊन लोकशाही पद्धतीने निर्णय घेतात. यापुढेही अशा प्रकारचे निर्णय घेतले जातील,’ असा विश्वास संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यांनी व्यक्त केला आहे. शरद पवारांनी त्यांचे मेहुणे प्रा. डॉ. एन. डी. पाटील, पुतणे अजित पवार, बहीण सरोज पाटील, मुलगी सुप्रिया सुळे यांना ‘रयत’च्या जनरल बॉडीवर सदस्य करून घेतले असून, ही पद्धत चुकीची असल्याचे मत प्रा. यू. जी. पाटील यांनी व्यक्त केले होते. तसेच, पवार व त्यांचा गोतावळा संस्थेचा मालक बनल्याचा आक्षेप त्यांनी घेतला होता. त्याला प्रत्युत्तर देताना हे आरोप तथ्यहीन आणि व्यक्तिद्वेषापोटी करण्यात आल्याचे संस्थेने म्हटले आहे. (प्रतिनिधी)