फलकाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:52 IST2021-02-27T04:52:07+5:302021-02-27T04:52:07+5:30
कचऱ्यामुळे दुर्गंधी सातारा : वासोळे, ता. सातारा येथील धोम कालव्याच्या भरावावर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या कचऱ्यामुळे कालव्याच्या ...

फलकाची मागणी
कचऱ्यामुळे दुर्गंधी
सातारा : वासोळे, ता. सातारा येथील धोम कालव्याच्या भरावावर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या कचऱ्यामुळे कालव्याच्या दरवाजामध्ये अडकून राहत असल्याने पुढे होणारा पाण्याचा प्रवाह संथ होत आहे. तसेच कचरायुक्त पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. कालव्याच्या बाजूला ऊसतोड मजुरांनी राहुट्या उभारल्या आहेत.
नियम कडक करा
सातारा : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे नागरिकांकडून मास्कचा वापर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे.
साक्षरता मेळावा
सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा लिंबच्यावतीने आर्थिक समावेशीकरण योजनेंतर्गत नागेवाडी (ता. सातारा) ग्रामपंचायत कार्यालयात आर्थिक व डिजिटल साक्षरता मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये सातारा विभागीय विकास अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.
घरबसल्या दर्शन
सातारा : कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने सज्जनगड येथील ३३८ वर्षांचा दासनवमी उत्सव अडचणीत आहे. मात्र, समर्थ भक्तांना दासनवमी उत्सवातील ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळून साजरे होणाऱ्या कार्यक्रमांचा लाभ आणि समर्थ निर्वाण सोहळ्याचे दर्शन घरबसल्या पाहायला मिळणार आहे.
बससेवा सुरू
खंडाळा : पारगाव-खंडाळा आगाराने पारगाव-खंडाळा ते पंढरपूर, तुळजापूर अशी बससेवा सुरू केल्याने भाविक प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे. आगारप्रमुख हेमंत नाळे, स्थानक प्रमुख ज्योतिंद्र फाळके यांच्या उपस्थितीत या बसचा प्रारंभ करण्यात आला. ही बस सुरू केल्याने परिसरातील भाविकांना प्रवास करणे सोपे झाले आहे.
स्टँडशेजारीच वडाप
सातारा : एसटी बसस्थानकाशेजारीच वडापचा ठिय्या सुरू झाला आहे. बसस्थानकापासून २०० मीटर अंतरावर प्रवासी वाहतुकीची अन्य वाहने थांबवू नयेत, असा नियम असतानाही तो पायदळी तुडवून वडापची प्रवासी वाहतूक सुरू आहे. आरटीओ, पोलिसांच्या दुर्लक्षामुळे त्यांचे फावते आहे.
जानुबाई यात्रा रद्द
खटाव : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने प्रशासनाच्या आदेशानुसार राजापूर (ता. खटाव) येथील श्री जानुबाई देवीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे राजापूर गाव एक ते तीन मार्चअखेर बंद राहणार आहे. नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
कोरोनाबाबत जनजागृती
सातारा : स्वच्छ सर्वेक्षण २०२१ च्या अनुषंगाने व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कऱ्हाड नगरपरिषदेच्या वतीने शहरातील जनजागृती करण्यात आली. सलग दोन वर्षे स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये कऱ्हाड नगरपरिषदेने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. यंदाही त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने राज्य शासन व जिल्हा प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही नियमावली जाहीर केली आहे. नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी ही मोहीम राबविण्यात आली.