सातारा : सातारा शहरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. बेकायदा टपऱ्या टाकून अनधिकृतपणे व्यवसाय केला जातो. त्या तातडीने हटवाव्यात अन्यथा शिवसेनाला ५०० टपऱ्या टाकण्याच्या परवानगी द्या, अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे यांनी पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साताऱ्यातील राजवाडा, मोती चौक, ५०० एक पाटी चौक, बसस्थानक, नगरपालिका, कोविड हॉस्पिटल परिसर, आरटीओ ऑफिस, जिल्हा परिषद, राजपथ, खणआळी, जिल्हा रुग्णालय, राधिका रोड, हुतात्मा चौक आदी ठिकाणी टपऱ्यांचे अतिक्रमण वाढले आहे. मोती चौक ते पाचशे एक पाटी या रस्त्यावर काही दुकानदार स्वत:चे दुकान असतानाही रस्त्यावर माल लावतात. दुचाकी लावायलाही जागा नसते. काही दुकानदार दुकानांसमोर बेकायदेशीरपणे हातगाडी लावून संबंधित व्यक्तींकडून महिन्याला हजारो रुपये आकारात आहेत. अनेक फळे, कपडे, स्टेशनरी, सौंदर्य प्रसादने, खाद्यपदार्थ विक्रेते रस्त्यावर अडथळे होईल, अशा पद्धतीने विक्री करतात. सदाशिव पेठेतील खणआळीतील अनेक दुकानदारांनी रस्त्यावर माल लावून वाहतुकीस अडथळा केला आहे. संबंधित अडथळे १५ दिवसांत हटवावेत, तसेच नोंदणीकृत टपऱ्याधारकांना योग्य तेथे जागा उपलब्ध करून द्यावी. अन्यथा शिवसेनेला पाचशे टपऱ्या अधिकृतपणे टाकण्यास परवानगी द्यावी.
निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी, सातारा पालिकेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, पोलीस अधीक्षक, शहर पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, सार्वजनिक बांधकाम विभाग, अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे.