जिल्ह्यात दोघांच्या मृत्यूने धडधड वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:06 IST2021-01-08T06:06:22+5:302021-01-08T06:06:22+5:30
सातारा : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधुन-मधून वाढत असल्याने नागरिकांच्या हृदयाची धडधड वाढू लागली आहे. बुधवारी माण आणि ...

जिल्ह्यात दोघांच्या मृत्यूने धडधड वाढली
सातारा : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधुन-मधून वाढत असल्याने नागरिकांच्या हृदयाची धडधड वाढू लागली आहे. बुधवारी माण आणि खटाव तालुक्यातील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. अचानक बळींची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, रात्री नवे ५६ रुग्ण आढळून आले असून, बाधितांची संख्या ५४ हजार ९९८ इतकी झाली आहे.
जिल्ह्यात गत महिनाभरापासून कोरोनाबाधितांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे. त्यामुळे सर्व व्यवहार आता पूर्वपदावर आले असतानाच, बुधवारी दोन बाधितांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सूर्याचीवाडी, (ता. खटाव) येथील ५७ वर्षीय महिला तसेच कासारवाडी, (ता. माण) येथील ७१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. बळींची संख्या आता १ हजार ७९७ वर पोहोचली आहे. गत काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्युसत्र आटोक्यात आले होते. परंतु अधुन-मधून एक-दोघांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
जिल्ह्यात कोरोनामुक्तीचेही प्रमाण वाढले असून, बुधवारी दिवसभरात ४३ जण, तर आतापर्यंत ५२ हजार ४५४ नागरिकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. कोरोना संपला, अशा भाबड्या कल्पनेत न रमता नागरिकांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वारंवार वापर करणे गरजेचे आहे. अनेकजण विनामास्क फिरत असताना दिसून येत आहेत. अशा लोकांवर आता पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
चौकट :
तपासणीसाठी पुन्हा गर्दी..
गत आठ दिवसांपासून रुग्णालयात तपासणीसाठीही गर्दी वाढू लागली आहे. दोन दिवसांत तब्बल ११५२ जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामधून ५६ जण बाधित आढळून आले. काहीजण तपासणी करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. नागरिकांनी अंगावर आजार काढू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.