भीषण आगीत गादी कारखाना खाक
By Admin | Updated: August 15, 2014 00:24 IST2014-08-14T23:05:56+5:302014-08-15T00:24:17+5:30
वारुंजी फाट्यानजीक दुर्घटना : लाखोंचे नुकसान, जीवितहानी टळली

भीषण आगीत गादी कारखाना खाक
मलकापूर : वारुंजी, ता. कऱ्हाड येथे गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत गादी कारखाना जळून खाक झाला. या दुर्घटनेत तयार गाद्यांसह, कापूस, कापड व इतर कच्चा माल, दुचाकी, मशिनरी आदी जळून लाखोंचे नुकसान झाले.
कऱ्हाडपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वारुंजी फाट्यानजीक गाद्यांचे कारखाने आहेत. यापैकी दस्तगीर बाळू नदाफ व अन्सार दस्तगीर नदाफ या दोघांच्या भागीदारीत असलेल्या कारखान्याला गुरुवारी दुपारी आग लागली. संबंधित कारखान्यांमध्ये गाद्या तयार करण्याचे काम केले जात होते. तसेच जुन्या गाद्यांचा कापूस पिंजण्याचेही काम कारखान्यात केले जायचे. कापडाच्या चिंध्यांपासून कापूस तयार केला जात असल्याने कारखान्यात जुन्या कापड्यांचे मोठ-मोठे ढीग तयार करण्यात आले होते. कापसाच्याही त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गाठी ठेवण्यात आल्या होत्या.
कारखान्यात वीस ते पंचवीस कामगार काम करीत असून, दुपारच्या सुमारास कामगारांनी जेवणासाठी सुटी केली. संबंधित कामगार कारखान्यापासून काही अंतरावरच असलेल्या वसाहतीत राहण्यास असल्याने दुपारी ते आपापल्या घरी निघून गेले. दरम्यान, दोन वाजण्याच्या सुमारास महेश जाधव व विठ्ठल जाधव (दोघेही रा. कालेटेक) हे दोघेजण दुचाकीवरून पाटणकडे निघाले असताना गादी कारखान्याच्या पाठीमागील बाजूस आग लागली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी आपली दुचाकी थांबवून आरडाओरडा केला. त्यावेळी परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेतली.
घटनेची माहिती त्वरित अग्निशामक पथकाला देण्यात आली. त्यानंतर काही वेळातच पालिकेचे अग्निशामक पथक त्याठिकाणी दाखल झाले. पथकातील कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या. मात्र, काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. आग वाढत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अग्निशामकचे आणखी तीन पथके त्याठिकाणी बोलविण्यात आली. अग्निशामकच्या चार गाड्यांतून पाणी मारण्यात आल्यानंतर पाच-सहा तासांनी आग आटोक्यात आली.
आग विझल्यानंतर गादी कारखान्याच्या मालकांसह कुटुंबीयांनी कारखान्यात धाव घेतली. मात्र, कारखान्यातील सर्व साहित्य खाक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे यांच्यासह अधिकारी व कर्मचारीही त्याठिकाणी दाखल झाले. उपअधीक्षक घट्टे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात झाली नव्हती. (प्रतिनिधी)
डोळ्यादेखत आपला कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याचे पाहताच नदाफ कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. कुटुंबातील काही महिला घरासमोर भरून ठेवलेल्या पाण्याच्या कळशा नेऊन आग विझविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत होत्या. मुलेही बॅरलमधील पाणी लहान भांड्यांनी नेऊन आगीवर टाकत होती. हे दृष्य हृदय हेलावून टाकणारे होते.
शॉर्टसर्किटने आग लागल्याचा संशय
कारखान्यानजीक वीज खांब असून, या खांबावरून परिसरातील घरांमध्ये कनेक्शन देण्यात आले आहे. कनेक्शनच्या वायरचे खांबावर जाळे तयार झाले आहे. दुपारी दोनच्या सुमारास खांबावर शॉर्टसर्किटने जाळ होऊन ठिणग्या उडाल्याचे व त्यामुळेच कारखान्याला आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
बावीस गॅस सिलिंडर रस्त्यावर
ज्याठिकाणी आगीची ही दुर्घटना घडली त्या परिसरात दाट लोकवस्ती आहे. भीषण आग नजीकच्या घरांपर्यंत पसरण्याची भीती होती. अशातच मोठी दुर्घटना टाळण्यासाठी महेश जाधव, विठ्ठल जाधव यांच्यासह स्थानिक युवकांनी तातडीने परिसरातील बावीस घरांतील गॅस सिलिंडर रस्त्यावर सुरक्षित ठिकाणी ठेवले.