टोमॅटोच्या मुद्दलातच होतोय घाटा!
By Admin | Updated: August 19, 2015 21:34 IST2015-08-19T21:34:40+5:302015-08-19T21:34:40+5:30
खटाव परिसर : दर कोसळल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत

टोमॅटोच्या मुद्दलातच होतोय घाटा!
खटाव : खटावसह परिसरात बऱ्याच शेतकऱ्यांनी टोमॅटोचे लागवड केली आहे; परंतु सुरुवातीच्या तोड्याला चांगला दर मिळाल्यानंतर टोमॅटोचे मार्केटमधील दर अचानक कमी आल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. टोमॅटोचे एक रोप एक रुपये या दराने विकत घेऊन शेतकरी या टोमॅटोच्या बागा तयार केल्या आहेत. एकरी दहा हजार रोपे सरासरी लावली जातात. या रोपांना लागणारे खत तसेच वारंवार किडीपासून संरक्षणाकरिता मारावी लागणारी औषधे आदीचा खर्च वीस हजारांपर्यंत येतो. तसेच तर रोपांची वाढ झाल्यानंतर दहा हजार काट्या, सुतळ्या, तारा आदीचा खर्च वेगळाच येतो. मजुरीचा खर्च पाहता या खर्चाचा ताळमेळ शेतकऱ्याला बसेनासा झाला आहे. ज्यावेळी मार्केटमध्ये टोमॅटोला भाव चांगला मिळेल; त्याच वेळी शेतकरी या सर्व गोष्टींचा खर्च वजा जाता हे पीक फायद्याचे ठरते; परंतु सध्या मार्केटमध्ये टोमॅटोचा दर इतका नीचांकी झाला आहे की, शेतकऱ्यांनी पाठवलेल्या कॅरेटच्या वाहतुकीचा खर्च तर सोडाच, ते टोमॅटो तोडण्यासाठी शंभर रुपये हजेरीने लावलेल्या मजुरीचाही खर्च अंगावर येत आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी टोमॅटोचे केलेले प्लॉट तोडीविना तसेच सोडून दिले आहेत. तर बऱ्या शेतातून टोमॅटोचा ढीग पडलेला दिसतो.
मी वीस गुठ्यांत टोमॅटोची लागवड केली आहे. सरासरी चार-पाच वेळा तोडा केला जातो. पहिल्या प्रथम काढलेल्या मालाला मार्केटमध्ये दर बऱ्यापैकी मिळाला; परंतु दुसऱ्या तोडीपासून दर अचानक उतरल्यामुळे आम्ही अडचणीत आलो. माझे टोमॅटोचे आठ कॅरेट मार्केटमध्ये पाठवले, त्याचे अवघे ८0 रुपये पट्टी आली. त्यामुळे मलाच कळले नाही की, माझ्या मालाला काय दर लागला ते. मी ते टोमॅटो काढण्यासाठी लावलेल्या मजुरांची मजुरीही त्यातून भागवता आली नाही. त्यामुळे टोमॅटोची बाग जनावरांसाठी सोडून दिली. माझ्यासारख्या बऱ्याच शेतकऱ्यांनी असाच निर्णय घेतला आहे.
- राजेंद्र जगदाळे, शेतकरी